परभणी ः गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे नुकसान झालेल्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शासनाने मंजूर केलेल्या १५७ कोटी ९७ लाख ९२ हजार अनुदानापैकी ५२ कोटी ६६ लाख रुपयांचा पहिला हप्ता प्राप्त झाला आहे. त्यापैकी ४२ कोटी १२ लाख रुपयांचा निधी नऊ तालुक्यांना वितरित केला आहे.
संबंधित शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांवर अनुदानाची रक्कम जमा केली जाणार आहे. अनुदानासाठी पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या तालुकानिहाय याद्या परभणी जिल्हा संकतेस्थळावर उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत, असे महसूल विभागाच्या सूत्रांनी सांगितले.
२०१७ मध्ये लागवड केलेल्या कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्यामुळे जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यातील कपाशीचे संपूर्ण क्षेत्र बोंड अळीमुळे बाधित झाल्याचे कृषी विभागातर्फे जाहीर करण्यात आले होते.
परंतु त्यानंतर कृषी सहायक आणि तलाठी यांच्या पथकाने प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या शेतावर जाऊन पंचनामे केल्यानंतर ३ लाख ५१ हजार ११८ शेतकऱ्यांच्या जिरायती क्षेत्रावरील २ लाख ३३ हजार २४ हेक्टरवरील कपाशीचे बोंड अळीमुळे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचे आढळून आले होते. शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने मागणी केल्यानुसार १५७ कोटी ९७ लाख ९२ हजार रुपये एवढा निधी मंजूर केला आहे.
हा निधी जिल्ह्याला तीन हप्त्यांमध्ये देण्यात येणार आहे. त्यानुसार मंजुरी निधीपैकी पहिल्या हप्त्यातील ५२ कोटी ६६ लाख रुपये एवढा निधी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाला असून, त्यापैकी ४२ कोटी १२ लाख रुपये निधी नऊ तालुक्यांना बिम्स प्रणालीवर उपलब्ध करून देण्यात आहे.
राष्ट्रीय आपत्ती निवारण बल (एनडीआरएफ)च्या निकषानुसार जिरायती शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ६ हजार ८०० रुपये याप्रमाणे दोन हेक्टरच्या मर्यादेत शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यांवर जमा करण्यात येणार आहे. बोंड अळीमुळे बाधित अनुदानासाठी पात्र शेतकऱ्यांच्या तालुकानिहाय याद्या परभणी जिल्हा संकेतस्थळावर उपलब्ध देण्यात आल्या आहेत, असे महसूल विभागाच्या सूत्रांनी सांगितले.