सांगली ः पंतप्रधान फळ पीकविमा योजनेंतर्गत जिल्ह्यातील ३४३० डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना १० कोटी ६३ लाख रुपयांची नुकसानभरपाई मंजूर झाली आहे. जिल्हा बॅंकेला ही रक्कम प्राप्त झाली असून, लवकरच संबंधित शेतकऱ्यांच्या खाती ही रक्कम वर्ग केली जाणार असल्याची माहिती संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
जिल्ह्यात डाळिंबाचे क्षेत्र सुमारे ८ हजार हेक्टरहून अधिक क्षेत्र आहे. त्यापैकी सर्वाधिक क्षेत्र आटपाडी तालुक्यात आहे. त्यानंतर जत तालुक्यात क्षेत्र अधिक आहे. पंतप्रधान फळपीक विमा योजनेतंर्गत डाळिंब पिकासाठी २०१६ मध्ये जिल्ह्यातील ३४३० शेतकऱ्यांनी विमा उतरवला होता. २१५५ हेक्टरसाठी १ कोटी १८ लाख ५२ हजार २२५ रुपयांचा विमा हप्ता भरला. २३ कोटी ७० लाख ४४ हजार ५०० रुपये विमा संरक्षित रक्कम होती. त्यापैकी ४५.४५ टक्के नुकसानभरपाई मंजूर झाली आहे. जत तालुक्यातील सर्वाधिक शेतकऱ्यांनी फळ पीकविमा योजनेचा लाभ घेतला आहे.
या योजनेतंर्गत हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत मिळाली आहे. जिल्हा बॅंकेला ही रक्कम प्राप्त झाली आहे. येत्या चार दिवसात ही रक्कम लाभार्थी यांच्या खात्यावर वर्ग केली जाणार आहे.
पंतप्रधान फळपीक विमा योजनेचा लाभ घ्यावा, यासाठी जिल्हाभर जनजागृती केली नसल्याची चर्चा शेतकऱ्यांमध्ये सुरू आहे. ज्यापध्दतीने जत तालुक्यातील शेतकरी विमा घेण्यासाठी पुढे आले, त्याच पद्धतीने आटपाडी तालुक्यातील शेतकरी पुढे आले नाहीत. याचे कारण म्हणजे, येथील कृषी कार्यालयात तालुका कृषी अधिकारीपद रिक्त असल्याने या कार्यालयातील अधिकाऱ्यांनी ही योजना शेतकऱ्यांपर्यंत पोचवलीच नाही. त्यामुळे या तालुक्यातील शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले आहेत.