पाच कृषी केंद्रांवर गुन्हे दाखल

कृषी विभागाच्या या कारवाईचा धसका घेत कृषी सेवा केंद्र संचालकांनी दुकाने बंद ठेवली होती. या प्रकरणात व्यावसायिकांचा नाहक बळी घेतला जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
पाच कृषी केंद्रांवर गुन्हे दाखल

यवतमाळ : कृषी कार्यालयाकडून प्रमाणित न करता कीटकनाशक विक्री करणाऱ्या जिल्ह्यातील पाच कृषी केंद्रचालकांविरुद्ध कृषी विभागाने शनिवारी (ता. ७) रात्री उशिरापर्यंत गुन्हे नोंदविले आहेत. यात कळंब एक, दारव्हा दोन व यवतमाळमधील दोन कृषी केंद्र संचालकांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

यवतमाळ शहरातील दोन कृषी केंद्रांवर शनिवारी वडगाव रोड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी बुधवारी (ता. ४) कृषी केंद्राची तपासणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पथकाने दत्त चौकातील कृषी वैभव व कृषी प्रगती केंद्रांची झाडाझडती घेतली. त्यात परवाना अधिकाऱ्यांची परवानगी नसताना कीटकनाशकांची विक्री होत असल्याची बाब समोर आली.

त्यानुसार वडगाव रोड पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. याप्रकरणी कृषी वैभवचे दिलीप चिंतावार, कृषी प्रगतीचे दिलीप बोगावार यांच्याविरुद्घ कीटकनाशक कायद्यान्वये गुन्हे नोंद करण्यात आले. पथकात उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, उपविभागीय कृषी अधिकारी कैलास गायकवाड, तालुका कृषी अधिकारी एस. ए. भवरे, पंचायत समितीचे कृषी अधिकारी राजेंद्र घोंगडे यांचा समावेश होता.

कृषी केंद्राची तपासणी होत असल्याने खळबळ उडाली आहे. शहरातील कृषी केंद्र बंद ठेवण्यात आल्याने तपासणीत अडथळा निर्माण होत असल्याची माहिती पथकातील सूत्रांनी दिली. तर कळंब तालुक्यातील सावरगाव येथील कृषी केंद्रचालकाविरुद्ध कळंब पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे कृषी केंद्रचालकांचे धाबे दणाणले आहे. शेतात फवारणी करताना तालुक्यातील 19 पेक्षा जास्त शेतकरी, शेतमजुरांना विषबाधा झाली आहे.

यात कळंब येथील देविदास मडावी, तर सावरगाव येथील गजानन फुलमाळी या दोघांचा मृत्यू झाला आहे. या प्रकाराने संपूर्ण जिल्ह्यासह राज्यात खळबळ उडाली. जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी तालुक्यात एक चौकशी समितीची स्थापना केली आहे. या समितीत तहसीलदार रणजित भोसले, तालुका कृषी अधिकारी पाठक, कृषी अधिकारी किशोर अंबरकर आदी अधिकाऱ्यांचा समावेश आहे.

या समितीने शनिवारी सावरगाव येथील जलराम कृषी केंद्रचालक संजय राजा यांची चौकशी केली. या चौकशीत त्यांनी कृषी विभागाकडून प्रमाणित न करता कीटकनाशकाची विक्री केल्याचे आढळून आले. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध कृषी अधिकारी किशोर अंबरकर यांनी कळंब पोलिसांत तक्रार दिली. प्राप्त तक्रारीवरून कळंब पोलिसांनी संशयित संजय राजाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलिस पीएसआय राजकिरण मडावी करीत आहेत.

तर दारव्हा तालुक्यात दारव्हा येथे व लाडखेड पोलिस ठाण्यातही गुन्हे नोंदविण्यात आल्याची माहिती आहे. दारव्हा येथील प्रवीण प्रभाकर भेलोंडे या कृषी केंद्रचालकावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याप्रकरणी पंचायत समितीचे कृषी अधिकारी राजीव शिंदे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. लाडखेड पोलिस ठाण्यात अंकिता अ‍ॅग्रो एजन्सीचे प्रीतम सुरेशचंद्र राठी यांच्याविरुद्घ गुन्हे नोंद करण्यात आले.

कारवाईचा धसका कृषी विभागाच्या या कारवाईचा धसका घेत कृषी सेवा केंद्र संचालकांनी दुकाने बंद ठेवली होती. या प्रकरणात व्यावसायिकांचा नाहक बळी घेतला जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com