बोंड अळीग्रस्तांकडून तक्रारींचा पाऊस

बोंड अळीग्रस्तांकडून तक्रारींचा पाऊस
बोंड अळीग्रस्तांकडून तक्रारींचा पाऊस

परभणी : राज्यातील २० ते २२ कापुस उत्पादक जिल्ह्यांत बोंड अळीच्या प्रादुर्भावाने शेतकरी अार्थिक अडचणीत सापडले आहेत. कृषी विभागाकडून बोंड अळीच्या नुकसानीचे तक्रार अर्ज भरून घेतले जात असून आवश्‍यक कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी 200 ते 300 रुपयेपर्यंत खर्च येत आहे. मदतीपासून वंचित राहू नयेत म्हणून गुरुवारी (ता. 30) कापुस पट्ट्यांतील जिल्ह्यांत शेतकऱ्यांनी "जी फार्म'च्या नमुन्यात तक्रार अर्ज दाखल करण्यासाठी मंडल कृषी अधिकारी कार्यालयांमध्ये गर्दी केली होती.

पहिल्या बहराच्या बोंडापासून एकरी 2 ते 5 क्विंटल उत्पादन मिळाले. परंतु त्यानंतर लागलेल्या बहराची बहुतांश बोंडे गुलाबी बोंड अळीच्या डंखामुळे किडकी झाली आहेत. कवडी झालेला कापूस नख्यातून ओढून काढावा लागत आहेत. दिवसभराच्या वेचणीत जेमतेमत पाच ते दहा किलो कापूस वेचून होत असल्यामुळे दहा ते बारा रुपये प्रतिकिलो मजुरी देऊनही मजूर वर्ग कापूस वेचणीस तयार होत नाही. रोजंदारीने कापूस वेचू, असे सांगितले जात आहे. दरम्यान गुरुवारी दुपारपर्यंत परभणी जिल्ह्याभरातून सुमारे 30 हजारावर तक्रार अर्ज दाखल झाले होते, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

75 टक्‍क्‍यांहून जास्त क्षेत्रावर प्रादुर्भाव यंदाच्या खरीप हंगामामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये 1 लाख 97 हजार 709 हेक्‍टर कापूस लागवड झाली आहे. ऑगस्ट महिन्यातच गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले आहे. 75 टक्‍क्‍यांहून अधिक क्षेत्रावरील कपाशीचे पीक बोंड अळीमुळे बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

यंदा चार एकरावर कापूस लागवड केली आहे. पहिल्या वेचणीचा आठ क्विंटल कापूस घरी आलाय. सध्या झाडावर असलेली किडकी बोंडे फुटत आहेत. परंतु त्यातून बळोबळी कापूस ओढून काढावा लागत आहेत. तक्रार अर्ज दाखल करतांना प्रत्येक कंपनीच्या वाणांसाठी वेगवेगळा फॉर्म भरून द्यावा लागत आहे. कागदपत्रे, प्रवास खर्चसह 400 ते 500 रुपये खर्च झाला आहे -प्रल्हाद विभूते , शेतकरी, वाडी दमयी, जि. परभणी

एका एकरमध्ये दोन क्विंटल कापूस निघाला आहे. आता पाते, फुले, बोंड लागली आहेत. एकही बोंड धड नाही. वेचणीसाठी 10 रुपये किलोने वेचणी करावी लागत आहे. आजवर 20 हजार रुपये खर्च झाला आहे. पण येथून पुढचा कापूस वेचणे परवडणार नाही. त्यामुळे त्यात ढोरं चरायला सोडणार आहोत. -बाळासाहेब चट्टे , शेतकरी, सारंगपूर, जि. परभणी

चार एकर स्वतःच्या शेतावरचा आणि चार एकर बटईच्या शेतात कापूस लागवड केलेली आहे. बियाणे खरेदीच्या पावत्या माझ्या नावावर आहेत. दोन्ही शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर बोंड अळी पडली आहे. बटईच्या शेतातील नुकसान भरपाई कशी मिळणार यांची चिंता आहे. -अशोक कदम , शेतकरी, मांडवा, जि. परभणी

आजवर दोन एकरांमध्ये गत वर्षी 25 क्विंटल कापूस निघाला होता. यंदा दहा क्विंटल कापूस निघाला. 3 हजार 900 रुपये क्विंटलने तो विकला. आता झाडावर असलेली 50 टक्‍क्‍यांहून अधिक बोंडे किडकी आहेत. परंतु आता पहिल्याएवढा कापूस निघणार नाही. -आत्माराम रनेर , शेतकरी, इस्माईलपूर, जि. परभणी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com