नगर - मराठवाड्यात पाण्यावरून संघर्षाची चिन्हे

नगर जिल्ह्यामधून मराठवाड्यासाठी पाणी सोडण्याचा निर्णय घेतला जाईल. मात्र, त्याबाबत येथील लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या हरकती नोंदवून घेतल्या, त्याला पाच महिने झाले. अजून जनसुनावणी झाली नाही. जनसुनावणी घेतल्याशिवाय आम्ही पाणी सोडू देणार नाही. - अनिल औताडे , तालुकाध्यक्ष, शेतकरी संघटना, श्रीरामपूर
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर ः पुरेसा पाऊस झाला नसल्याने यंदा मराठवाड्यातील धरणांमध्ये पुरेसे पाणी उपलब्ध नाही. नगर जिल्ह्यातही भंडारदरा, निळवंडे वगळता अन्य धरणे भरलेली नाहीत. मात्र आता नगरमधून मराठवाड्यासाठी पाणी सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. सोमवारी औरंगाबाद येथे नगर, मराठवाड्यातील धरणांतील पाणीसाठा स्थितीबाबत बैठक झाली. त्या बैठकीतच नगरच्या नेत्या-कार्यकर्त्यांनी विरोध केला. त्यामुळे दुष्काळाच्या कचाट्यात पाण्यावरून नगर- मराठवाड्याचा संघर्ष पेटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. सत्ताधारी मंत्र्यांची मात्र या मुद्यावरून अडचण होणार आहे.

मराठवाड्यातील जायकवाडी प्रकल्पाचे नगर, नशिक जिल्ह्यात पाणलोट क्षेत्र आहे. नगर, नाशिकमधून जाणाऱ्या पाण्यावरच जायकवाडीचे भवितव्य अवलंबून आहे. यंदा जायकवाडी प्रकल्पात ३८ टक्के पाणी उपलब्ध आहे. मात्र जायकवाडीवर निम्म्या मराठवाड्याची तहान भागवली जात आहे. जायकवाडी धरण ६५ टक्‍क्‍यांपेक्षा कमी भरल्यास समन्यायी वाटप कायद्यानुसार ऊर्ध्व गोदावरी खोऱ्यातील धरण समूहातून मेंढेगिरी समितीच्या अहवालानुसार पाणी सोडण्याचे न्यायालयाचे आदेश आहेत. सध्या जायकवाडीत उपलब्ध असलेल्या पाण्यानुसार सहा टीएमसी पाणी जायकवाडीला सोडावे लागणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. नियमानुसार पाणी द्यावे लागेल, असे जलसंपदा मंत्र्यांनीही सांगितले आहे.

मात्र मराठवाड्यासाठी जायकवाडीला पाणी देण्याला नगरमधील नेत्या- कार्यकर्त्यांनी विरोध केला आहे. शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते अनिल औताडे, सुरेश ताके, जितेंद्र भोसले, दिलीप इंगळे, भरत आसणे, विठ्ठलराव शेळके, युवराज जगताप, शिवाजी जवरे, शरद पवार यांच्यासह कार्यकर्त्यांनी पाणी देण्याला विरोध केला आहे. सोमवारी या कार्यकर्त्यांनी गोदावरी- मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना याबाबत निवेदन दिले आहे.

गोदावरी जल आराखड्यासंदर्भातील नोंदवलेल्या लेखी हरकती बाबतची जन सुनावणी घेतल्यानंतरच २००५ च्या समन्यायी पाणीवाटप कायद्याची अंमलबजावणी करण्याची त्यांची मागणी आहे. नगर जिल्ह्यातील मुळा, भंडारदरा धरणातून २०१३ मध्ये पाणी सोडण्यात आले होते. त्या वेळी असाच पाण्यावरून नगर- मराठवाड्यात बराच संघर्ष झाला होता, मात्र नियमानुसार पाणी सोडले होते.

यंदा २०१३ पेक्षा परिस्थिती चांगली असल्याचे नगरमधील नेत्या-कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. यंदाचा पावसाळा आता कुठे संपला आहे. अजून आठ महिने जायचे आहेत. अशा परिस्थितीत आताच टंचाईच्या झळा बसू लागल्या असून पाणी सोडण्याबाबत चर्चा सुरू आहेत. त्यामुळे नगर- मराठवाड्यात आगामी काळात पाण्यावरून चांगला संघर्ष होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. मराठवाड्याला पाणी देण्याबाबत मात्र सत्ताधारी नेत्यांना ‘नेमके काय बोलावे आणि कोणाची बाजू घ्यावी’ या प्रश्‍नाने अडचण झाली आहे.

नगर जिल्ह्यामध्ये गंभीर दुष्काळ आहे. ज्या धरणातून पाणी सोडले जाते, त्या भंडारदरा, निळवंडे असलेल्या अकोले तालुक्‍यात गंभीर दुष्काळ आहे. जायकवाडीत सध्या बऱ्यापैकी पाणी शिल्लक असल्याने पाणी सोडून देणार नाही. त्यासाठी संघर्ष करण्याची तयारी आहे, असे अकोल्याचे आमदार वैभव पिचड यांनी सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com