सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग ः नारळाचे दर ३० रुपयांपर्यंत पोचले आहेत. परिणामी बाजारपेठेतून नारळ खरेदी करण्यापेक्षा सरळ बागायतदारांकडून सूट तत्त्वावर नारळ खरेदी करणारा ग्राहकवर्ग अलीकडे वाढत आहे.
गेल्या चार महिन्या आधीपासूनच नारळाच्या उत्पादनात कमालीची घट झाली होती. निसर्गाची योग्य साथ न मिळाल्यामुळेच ही स्थिती निर्माण झाली होती. सुरुवातीला २५ नंतर २७ रुपये तर आता सरळ ३० रुपयांपर्यंत नारळाचे दर पोचले आहेत.
केरळमधून येणाऱ्या नारळाचीही आवक यंदा घटली. त्यामुळे नारळ भावाचा सर्वसाधारण समतोलही राहिला नाही. स्थानिक बाजारपेठेतही चढ्यादराने आकारानुसार नारळाचा भाव आकारला गेल्यामुळे सर्वसाधारण नागरीकांसाठी नारळ महाग झाला.
नारळ हे कोकणचे महत्वाचे पिक आहे. परिणामी बाजारपेठातून नारळ खरेदी करण्यापेक्षा बागायतदाराकडूनच एकत्रित नारळ खरेदी करण्यात येत आहे. पंधरा दिवस किंवा महिनाभर पुरेल, असे एकत्रित नारळाची खरेदी केल्यामुळे त्यावर मिळत असलेली सुट हेच मोठे समाधान अशी धारणा लोकांची झालेली दिसून येत आहे. परिणामी बाजारपेठ स्थानिक असली तरी अलिकडेच खरेदीची हिच स्थिती निर्माण झालेली दिसून येत आहे.