कपाशीच्या उभ्या पिकात नांगर

कपाशीच्या उभ्या पिकात नांगर
कपाशीच्या उभ्या पिकात नांगर

औरंगाबाद/अकोला/नागपूर : कापूस पट्ट्यातील अनेक भागांत कपाशीवर रोग आणि कीडीचा मोठा प्रादुर्भाव झाला आहे. काही ठिकाणी तर कपाशीचे पीकच आलेले नाही. ज्या शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे याविषयी माहिती दिली त्यांची प्रत्यक्ष शहनिशा करण्याची तसदी अधिकाऱ्यांकडून घेतली गेली नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. या सर्व प्रकारानंतर कपाशीच्या उत्पादन खर्चाची भरपाईदेखील होणे शक्‍य नसल्याची जाणीव झाल्यामुळे आता शेतकऱ्यांद्वारे हे पीक काढून टाकले जात आहे. शेलूबोंडे (जि. अकोला) येथील शेतकऱ्यांनी कपाशीचे पीक न अाल्याने उभ्या पिकात नांगर घातला. अमरावती, यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांनी कपाशी उपटून टाकली, तर काहींनी पिकात जनावरे सोडली आहेत.

यंदा मराठवाड्यात गृहीत सरासरी 17 लाख 17 हजार 451 हेक्‍टरवर कपाशीचे क्षेत्राच्या तुलनेत 91 टक्‍के अर्थात 15 लाख 64 हजार 94 हेक्‍टरवर कपाशीची लागवड झाली. सुरवातीला ऐन कायीक वाढीच्या काळातच पाउस बेपत्ता झाल्याने कपाशीची वाढ निम्म्यापेक्षा जास्त प्रमाणात घटली. यंदा सोयाबीन, मूग, उडीद आदी पीक हातची गेल्याने प्रदीर्घ खंडानंतर आलेल्या परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांनी कपाशीची सोय केली. त्यामुळे काही अंशी उत्पादनाची आशा निर्माण झाली. परंतु, शेंदरी बोंडअळीने शेतकऱ्यांच्या या आशेवर पाणी फेरले आहे. शेंदरी बोंड अळीच्या प्रादूर्भावाविषयी प्रशासकीय यंत्रणा काय करायच याविषयी शासनाच्या आदेशाची वाट पाहते आहे. दुसरीकडे पीक गेले, पाणी आहे, त्यामुळे हे पीक काढून निदान दुसरं पीक घेता यावं कधी पंचनामे होतात यासाठी शेतकरीही पंचनाम्याची वाट पाहत असल्याचे चित्र आहे.

विदर्भातील अमरावती जिल्ह्यात 5 हजार हेक्‍टरपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आतापर्यंत कपाशीवर नांगर फिरविल्याचे सूत्रांनी सांगीतले आहे. अमरावती पाठोपाठ यवतमाळ जिल्ह्यातदेखील शेतकऱ्यांनी कपाशी काढून टाकली, काहींनी या पिकात जनावरे सोडली आहेत. या जिल्ह्यात साडेसात लाख हेक्‍टरपैकी साडेचार लाख हेक्‍टरवर कपाशी लागवड आहे.

मूर्तिजापूर तालुक्यातील शेलूबोंडे (जि. अकोला) येथील शेतकऱ्यांनी कपाशीचे पीक न अाल्याने कंपनीने बियाण्यामध्ये फसवणूक केल्याचा अारोप केला अाहे. शेलूबोंडे येथील ज्या शेतकऱ्यांनी कपाशी पेरली त्यांनी सामूहिकरित्या तपासणी केली असता, सर्वत्र गुलाबी बोंड अळीच दिसून अाली. मूर्तिजापूर तालुक्यातील विजय सरोदे, सुभाष सरोदे, दिलीप सरोदे, नामदेव सरोदे, अंबादास बोडे, गजानन बोंडे, प्रवीण बोंडे सह अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील कपाशीचे पीक नष्ट केले आहे.

बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील कापूस उत्पादकांचे सुमारे 10 हजार कोटीपेक्षा अधिकचे नुकसान झाल्याचा दावा (कै.) वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी केला आहे. पंतप्रधान कार्यालयाला त्यांनी या संदर्भाने अहवाल दिला आहे.

प्रतिक्रिया बहूतांश शेतकऱ्यांच्या शेतात बोंड अळीचे प्रमाण 40 ते 90 टक्‍क्‍यांपर्यंत आहे. 45 दिवसांतच बोंड अळीचा अटॅक सुरू झाला. पर्यायी पीक नसल्याने तज्ञांनी पुढील हंगाम सुरक्षित होईल यासाठी उपाय योजावे. - निवृत्ती घुले , अध्यक्ष कृषी विकास शेतकरी बचत गट, वखारी, जि. जालना.

बोंड अळीबाबत परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतरही केवळ कागदी घोडे नाचविण्यापलीकडे काही होतांना दिसत नाही. - दीपक जोशी , अध्यक्ष जय जवान जय किसान शेतकरी मंडळ देवगाव, जि. औरंगाबाद.

आमचं न भरून निघणारं नुकसान झालयं. काय परीक्षण करायचं ते तातडीनं करून आमचा पुढील हंगाम सुरक्षित होईल असं शासन, प्रशासन, तज्ञांनी पहावं. - धनंजय सोळंके , कापूस उत्पादक शेतकरी, नागापूर, ता. परळी, जि. बीड.

कृषी विभागाच्या गुणनियंत्रण विभागाने याकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष केल्याचे प्रथमदर्शनी दिसते. त्यामुळे या सर्व प्रकरणाची सीबीआय चौकशीची मागणी केली आहे.' - सिकंदर शहा , शेतकरी वारकरी संघटना, यवतमाळ.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com