खानदेशात कापूस उत्पादकांचा कल उसाकडे !

कपाशीचे क्षेत्र घटेल की नाही हे सांगता येणार नाही, परंतु कृषी विभाग पुढील हंगामासाठीदेखील सरासरी लागवड क्षेत्र लक्षात घेऊन कपाशी बियाण्याची मागणी करील. जळगावात राज्यात सर्वाधिक कापूस लागवड होते. त्यात पूर्वहंमगामी कपाशीही बऱ्यापैकी असते. - मधुकर चौधरी, कृषी विकास अधिकारी, जळगाव
ऊस, कापूस
ऊस, कापूस

जळगाव ः कपाशीचे पीक आतबट्ट्याचे ठरत असल्याने धुळ्यासह जळगाव जिल्ह्यातील अनेक शेतकरी ऊस व लिंबूवर्गीय पिकांकडे वळले आहेत. कपाशीखालील क्षेत्र खानदेशात पुढील हंगामात मिळून सुमारे अडीच लाख हेक्‍टरने घटू शकते. यामुळे कपाशी बियाणे व खतांच्या बाजारातील उलाढालही सात ते आठ कोटींनी कमी होईल, अशी शक्‍यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. यंदा कपाशीवर गुलाबी बोंड अळीचा प्रकोप एवढा झाला की पूर्वहंगामी कपाशीचे उत्पादन एकरी पाच क्विंटलही जेमतेम आले. तर कोरडवाहू कपाशीत ५० किलोही उत्पादन एकरी हाती आले नाही. पुढील वर्षीही कपाशीबाबत अशीच स्थिती राहील की काय म्हणून ज्या शेतकऱ्यांकडे पुरेसा जलसाठा किंवा कृत्रीम जलसाठे मुबलक आहेत त्यांनी ऊस व लिंबूवर्गीय पीक लागवड सुरू केली आहे.  धुळ्यात नेर, कुसुंबा या जलसाठे मुबलक असलेल्या भागात ऊस लागवड सुरू आहे. धुळे तालुक्‍यातील कापडणे, न्याहळोद भागात कांदा लागवड पद्धतीत बदल करून गादी वाफे व मल्चिंग, ठिबकचा वापर सुरू झाला आहे. कमी पाण्यात पुढेही कपाशीऐवजी कमी कालावधीचे पीक घेण्याचा प्रयत्न या भागात आहे. तर शिरपुरातही ऊस लागवड जोमात सुरू आहे. शिरपुरातील तरडी, बभळाज, होळनांथे, जापोरा, अर्थे, तऱ्हाडी आदी भागात ऊस लागवड वाढेल, असे सांगण्यात आले. तापी व गिरणा काठावरील गावांमध्ये लिंबूर्गीय पिकांसह कमी कालावधीची कांदा, भाजीपाला पिके घेण्यासाठी शेतकरी सरसावले आहेत. जळगाव, भडगाव भागात लिंबू, सीताफळ आदी फळबागांकडे काही शेतकरी वळले आहेत. जळगाव जिल्ह्यात उसाचे क्षेत्र ११ हजार हेक्‍टर एवढे होते. त्यात यंदा सुमारे तीन ते चार हजार हेक्‍टरने वाढ होण्याची शक्‍यता आहे. बियाणे बाजाराला फटका शक्‍य अनेक कपाशी घेणारे शेतकरी अधिक व कमी कालावधीच्या पिकांकडे वळल्याने पुढे कपाशीखालील क्षेत्र कमी होईल. कपाशी बियाण्याची गरजही क्षेत्र कमी होणार असल्याने सुमारे ११ लाख पाकिटांनी कमी होईल. परिणामी कपाशी व खतांच्या बाजारातील उलाढालही अंदाजित सात ते आठ कोटींनी कमी होईल. असे आहेत अंदाज... खानदेशातील कपाशीखालील क्षेत्र (आकडे हेक्‍टरमध्ये) २०१७-१८---२०१८-१९ आठ लाख---साडेपाच लाख आवश्‍यक कपाशी बियाणे  २०१७-१८---२०१८-१९ जळगाव जिल्हा  २२ लाख पाकिटे---१६ लाख पाकिटे धुळे व नंदुरबार  १४ लाख पाकिटे---नऊ लाख पाकिटे जळगाव जिल्ह्यातील क्षेत्र २०१७-१८---२०१८-१९ चार लाख ७५ हजार---साडेतीन लाख

धुळे व नंदुरबारमधील क्षेत्र २०१७-१८---२०१८-१९ तीन लाख २५ हजार---दोन लाख

खते व कपाशी बियाणे बाजारातील उलाढाल (अंदाजित) २०१७-१८---२०१८-१९ २७ कोटी---१९ ते २० कोटी प्रतिक्रिया काही खासगी साखर कारखाने सुरू होत आहेत. ऊस तोडणीबाबतच्या अडचणी कमी झाल्या आहेत. तसेच ऊस पिकात केळी, कपाशीसारखी जोखीम नाही. गारपीट, वादळाचा उसाला फटका अतिशय कमी बसतो. म्हणून उसाकडे शेतकरी वळतील, असे चित्र आहे.  - नाना भाऊसिंग पाटील, शेतकरी, पिंप्री खुर्द, (जि. जळगाव)

कपाशीवर एवढी रोगराई आली की खर्च अधिक झाला. उत्पन्न अतिशय कमी आल्याने शेतकरी कर्जबाजारीच राहील, अशी स्थिती आहे. कपाशी खानदेशचे प्रमुख पीक असले तरी पुढील वर्षी क्षेत्र मोठ्या प्रमाणात घटेल, असे वाटते. कारण तापीकाठावर भाजीपाला, ऊस याकडे शेतकरी वळले आहेत.  - प्रकाश पाटील, शेती विषयाचे अभ्यासक, धुळे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com