यवतमाळ : कापूस पिकावर सातत्याने येणाऱ्या संकटांमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. मागील हंगामात बोंड अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे यंदा जिल्ह्यातील कापूस लागवड क्षेत्रात एक लाख हेक्टरने घट होण्याची शक्यता कृषी विभागाने खरीप नियोजन अहवालात व्यक्त केली आहे.
कापूस जिल्ह्यातील हुकमी पीक. या पिकावरच शेतकऱ्यांचे वर्षभराचे नियोजन अवलंबून असते. मात्र, मागील वर्षापासून पिकावर होणारे किडींचे आक्रमण, कापसाला नसलेला हमीभाव, लागणारा खर्च आदी कारणांमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
अशातच मागील खरीप हंगामात बोंड अळीचा कापसावर प्रादुर्भाव झाला. त्यात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. चांगले उत्पन्न येईल, या आशेने शेतकऱ्यांनी निंदणीपासून ते फवारणीपर्यंत खर्च केला. मात्र, यानंतरही बोंड अळीने एकरच्या एकर पीक फस्त केले. त्यामुळे शेतकऱ्यांनी उभ्या पिकावर नांगर फिरविला.
यंदाही कपाशीवर बोंड अळीचा प्रादुर्भाव होईल, अशी शक्यता कृषी अभ्यासक व्यक्त करीत आहेत. त्यामुळे यंदा जिल्ह्यात कापसाचे पेरणीक्षेत्र घटण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे.
मागील खरीप हंगामात जिल्ह्यात पाच लाख हेक्टरवर कापसाची लागवड झाली होती. यंदा या क्षेत्रात तब्बल ७५ हजार ते एक लाख हेक्टरने घट होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे पेरणीक्षेत्र चार लाख हेक्टरवर येण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. शनिवारी (ता. पाच) राज्य खरीप आढावा बैठकीतही तसा अहवाल जिल्ह्यातर्फे मांडण्यात येणार आहे.
बोंड अळीपासून कापसाचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी कामगंध सापळे (फेरोमन ट्रप) लावावेत. प्रतिहेक्टरी २० या प्रमाणात कामगंध सापळे लावण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.जिल्ह्यात यंदा चार ते सव्वाचार लाख हेक्टरवर कपाशीची लागवड होण्याची शक्यता आहे. त्यासाठी साधारणतः १७ लाख बियाणे पाकिटे लागणार आहेत. पेरणीसाठी बियाणे उपलब्ध आहेत. बियाण्यांची अडचण जाणार नसल्याचेही कृषी विभागाने स्षष्ट केले आहे.