देशांतर्गत कापूस दरवाढीचा निर्यातीला फटका

देशांतर्गत कापसाचे दर वाढल्याने स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय बाजारांत कापूस किमतीत फरक निर्माण झाला आहे. त्यामुळे भारतीय निर्यातदारांना निर्यातीचे करार पूर्ण करण्यास किंवा नवीन व्यवहार करण्यास अडचणी येत आहेत. आॅक्टोबरमध्ये झालेले अनेक करार आता रद्द होण्याच्या मार्गावर आहेत. - अतुल गनात्रा, अध्यक्ष, काॅटन असोशिएशन आॅफ इंडिया.
कापूस निर्यात
कापूस निर्यात

मुंबई ः देशात सुरवातीला बंपर कापूस उत्पादनाचा अंदाज व्यक्त केल्यानंतर महत्त्वाच्या कापूस उत्पादक राज्यांमध्ये बोंड अळीचा प्रादुर्भाव आणि काही भागांतील दुष्काळसदृश स्थितीमुळे कापूस उत्पादनात घट झाली आहे. त्यामुळे देशांतर्गत कापसाचे दर वाढले आणि त्यातच आंतरराष्ट्रीय चलन बाजारात रुपया मजबूत झाल्याचा फटका कापूस निर्यातीला बसणार आहे. या दोन्ही कारणांमुळे पुढील दोन महिन्यांत ५ लाख गाठी (एक गाठ = १७० किलो) कापूस निर्यातीचे करार रद्द होऊ शकतात, असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.  व्यापारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘‘देशांतर्गत कापसाचे दर वाढल्याने कापूस महाग झाला आहे. त्यातच रुपया मजबूत झाल्याने त्याचा परिणाम निर्यातीवर होणार आहे. करार झाले त्याच किमतीला कापूस निर्यात परवडणारी नाही. सध्या १० लाख गाठींच्या दरासाठी पुन्हा वाटाघाटी सुरू आहे आणि त्यातील निम्मे म्हणजेच ५ लाख गाठींचे करार रद्द होण्याच्या मार्गावर आहेत.’’ मल्टिकमोडिटी एक्सचेंज आॅफ इंडियानुसार, मागील सहा ते सात आठवड्यांत कापसाचे दर १२ टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे डिसेंबरमध्ये निर्यातीवर परिणाम झाला आहे. निर्यात करारावर परिणाम मुंबई येथील एका व्यापारी म्हणाला, ‘‘या हंगामातील कापूस आवक सुरू होण्यापूर्वी नोव्हेंबरमध्ये ज्या व्यापाऱ्यांनी कापूस निर्यातीसाठी ७३ ते ७७ सेंट्सप्रमाणे आगाऊ करार केले होते, त्यांना आता कापसाचे दर ८२ ते ८३ सेंट्सवर गेल्याने आपल्या कराराप्रमाणे कापूस निर्यात करणे अवघड झाले आहे.’’ आणखी एक व्यापाऱ्याने सांगितले, ‘‘आॅक्टोबरच्या सुरवातीपासून भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत ३ टक्क्यांनी वाढला आहे. सध्या ६४ रुपयांवर डॉलरचे मूल्य आले आहे. आॅक्टोबरपासून २२ ते २५ लाख गाठींच्या व्यवहाराचे करार झाले आहेत आणि त्यापैकी जवळपास १३ लाख गाठींची निर्यातसुद्धा केली आहे.’’ निर्यात कमी होणार देशांतर्गत बाजारात दर वाढल्याने सरकारने २०१७-१८ मध्ये निर्यात कमी होऊन ६७ लाख गाठी निर्यातीचे लक्ष ठेवले आहे. भारतीय कापूस महामंडळाने आधीच्या ६३ लाख गाठी निर्यातीच्या अंदाजात १३ टक्के घट करून ५५ लाख गाठी निर्यात होणार असल्याचा अंदाज जाहीर केला आहे. भारतीय कापसाचे बांगलादेश, व्हिएतनाम, चीन आणि टर्की हे मुख्य आयातदार देश आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com