सिल्लोड, जि. औरंगाबाद : कापसाच्या उत्पादनात अग्रसेर असलेल्या सिल्लोड तालुक्यात यंदा मात्र कापूस उत्पादनात घट होण्याचा अंदाज आहे.
सिल्लोड तालुक्यात यंदा ९८ हजार हेक्टर लागवडीयोग्य क्षेत्रापैकी ४३ हजार हेक्टरवर कापसाची लागवड करण्यात आली आहे. पावसाने दिलेला ताण त्याचबरोबर किडींचा मोठ्या प्रमाणात झालेल्या प्रादुर्भावामुळे याचा फटका कापसाच्या उत्पन्नास बसला आहे.
बियाणे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी कापसाचे उत्पन्न वाढण्यासाठी विविध कपाशींचे वाण बाजारात आणले खरे मात्र, यापासून शेतकऱ्यांच्या पदरात पडणारे उत्पन्न, त्यावर झालेला खर्च याचा विचार केल्यास एकरी वीस क्विंटलपर्यंत कापसाचे उत्पन्न घेणारा शेतकरी यंदा पदरात एकरी सात ते आठ क्विंटल उत्पन्नसुद्धा मिळणार की नाही, या आशेने हैराण आहे.
महागडी खते, औषधांची फवारणी केल्यानंतरही पदरी पडणाऱ्या कमी उत्पादनाचा विचार पाहता, शेतीचा व्यवसाय आतबट्ट्याचा होत असल्याची चिन्हे आहेत. त्यातच पावसाने कापूस ओला झाल्याचे कारण पुढे करित व्यापारीदेखील पडेल भावामध्ये कापसाची खरेदी करीत आहेत. सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना परत सावकाराच्या दारातच उभे रहावे लागणार आहे.
तालुक्यात खासगी जिनिंगचे बस्तान मोठ्या प्रमाणात आहे. याचा फायदा योग्य बाजारभाव मिळण्यासाठी होणे गरजेचे असताना दलालांच्या माध्यमातूनच जिनिंगवर कापूस नेल्या वाचून पर्याय नसल्यामुळे शेतकऱ्यांचा कापूस व्यापाऱ्यांच्या माध्यमातूनच विक्री होत असल्याने या साखळीमध्ये केवळ शेतकऱ्यांचेच मरण होत आहे.
खरीप हंगामाच्या पेरणीनंतर शेतकऱ्यांना पिकांच्या वाढीसाठी; तसेच भरघोस उत्पन्न घेण्यासाठी कृषी विभागामार्फत मार्गदर्शन होणे गरजेचे असताना या विभागाच्या वतीने केवळ सोपस्कार पूर्ण करण्याचा प्रकार बघावयास मिळत आहे. शेतकऱ्यांना बांधावर जाऊन मार्गदर्शन करणे गरजेचे अाहे. कार्यालयातच अहवाल तयार करण्याचा होत असलेला कारभार शेतकऱ्यांना अडचणीचा ठरत आहे.