ऐन सणासुदीत शेतकरी रानात व्यस्त

सरकार शेतकऱ्यांचा सातत्याने विश्‍वासघात करत आहे. कर्जमाफीची रक्कम अजूनही खात्यावर जमा झालेली नाही. सोयाबीन खरेदीसाठी सुरू करण्यात आलेली केंद्र ही केवळ दिखावा आहे. कारण पीक पेऱ्याच्या अजूनही नोंदी झाल्या नसल्यामुळे या केंद्रावर सोयाबीन पाठवता येत नाही. शासनाने कोणत्याही अटीशिवाय किमान आधारभूत किंमतीपेक्षा जास्त दराने सोयाबीन खरेदी करावी. - अधिकराव देशमुख, शिवाजीनगर, जि. सातारा.
शेतीची कामे वेगात सुरु
शेतीची कामे वेगात सुरु

सातारा ः परतीच्या दमदार पावसाच्या उघडिपीनंतर जिल्ह्यात खरिप हंगामातील सोयाबीन, भुईमूग, ज्वारी आदी पिकांची काढणी वेगात सुरू आहे. परतीच्या पावसामुळे काढणीचा काळ पुढे गेल्याने ऐन दिवाळी सणात शेतकरी रानात राबत असल्याने ऐन सणासुदीत शेतकरी रानात असे चित्र सर्वत्र दिसत आहे. 

परतीच्या पावसाने जिल्ह्यातील बहुतांशी ठिकाणी पिकांचे नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे पिके पाण्यात राहिल्याने कुजली होती. शेतात पाणी असल्याने काढणीला आलेली पिके तशीच ठेवण्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय उरला नव्हता. खरिप हंगामात तीन लाख १५ हजार हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. यामध्ये सोयाबीन पिकांची विक्रमी ७३ हजार हेक्‍टर क्षेत्रावर पेरणी झाली.

जिल्ह्यात मागील चार दिवसापासून पावसाने उघडीप दिल्यानंतर सोयाबीन काढणीस वेग आला आहे. परतीच्या पावसामुळे पिकांची काढणी १५ दिवस पुढे गेली आहेत. यामुळे दिवाळी साजरी करण्याचे सोडून पिके काढणीसाठी शेतात जाण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. एकाचवेळी पीक काढणीस प्रारंभ झाल्यामुळे मजुरांची पळवापळवी सुरू झाली आहे. त्यामुळे मजुरांची टंचाई भासत असून कुटुंबातील सर्व सदस्य शेतात पीक काढणी करताना दिसून येत आहेत. पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांची जास्त धावपळ सुरू असून मजुरांकडून जास्त मजुरी घेतली जात आहे. पिके घरी नेण्यासाठी शेतकऱ्यांकडून मजुरांच्या मागण्या पूर्ण केल्या जात आहे. परतीच्या पाऊस जास्त काळ आणि दमदार झाल्यामुळे पिके जास्त दिवस पाण्यात राहिली होती. या फटका पिकांच्या उत्पादनावर बसत आहे. जोरदार पावसामुळे सोयाबीन, ज्वारी, बाजरी, भात ही पिके कुजल्याने व झडल्याने अपेक्षित उत्पादन मिळत नाही. सध्या सोयाबीन काढणी सुरू आहे. सोयाबीनचे एकरी सरासरी चार ते सहा क्विंटल उत्पादन मिळत असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

सोयाबीन हे पीक दिवाळीच्या तोंडावर पैसे देणारे पीक म्हणून बघितले जाते. मात्र, या सणाच्या तोंडावर किमान आधारभूत किंमतीपेक्षा कमी दराने सोयाबीनची खरेदी केल्यास कारवाईचे आदेश असल्याने व्यापाऱ्यांकडून सोयाबीनची खरेदी बंद करण्यात आली आहे.यावर पर्याय म्हणून जिल्हा मार्केटींग विभागाकडून जिल्ह्यात कऱ्हाड व सातारा येथे दोन सोयाबीन खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहे.

या केंद्रावर विक्री करण्याकरिता शेतकऱ्यांकडे सात बारा उताऱ्यावर खरिपातील पीकपेरा नोंद असणे आवश्‍यक आहे. मात्र ही अट सध्या शेतकऱ्यांना अडचणी ठरत आहे. रब्बी हंगामावर सुरू झाल्यानंतर खरिपतील पीक पेरा नोंदी केल्या जातात. यामुळे सोयाबीन विक्रीसाठी लागणारा पीकपेरा नसल्यामुळे या खरेदी केंद्रावर सोयाबीनची विक्री करता येत नाही. यामुळे सोयाबीन काढून तो साठवण्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय उरलेला नाही.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com