कोल्हापूर : गेल्या चार दिवसांत झालेल्या जोरदार पावसाने जिल्ह्यातील खरीप पिकांची काढणी ठप्प झाली आहे. दररोज सातत्याने पडणारा पाऊस पीक काढणीत मोठा व्यत्यय आणत आहे. येत्या चार दिवसांत पाऊस न थांबल्यास उभ्या सोयाबीन पिकाला कोंब येण्याची शक्यता आहे.
दिवसभर कडक ऊन, उष्णता आणि सायंकाळी एक ते दोन तास जोरदार पाऊस असे वातावरण सध्या जिल्ह्यात आहे. यामुळे दिवसभर ऊन असूनही सायंकाळी पाऊस होण्याच्या शक्यतेने शेतकरी खरीप पिकाच्या काढणीची तयारी करत नसल्याचे चित्र आहे. शेतात वाफसा नसल्याने आता काढणीस आलेली पिके काढायची कशी याच चिंतेत शेतकरी आहेत.
जिल्ह्यात या वर्षी ४ लाख ७६ हजार हेक्टरवर खरीप पीक पेरणी प्रस्तावित होती. यामध्ये ३ लाख ४३ हजार हेक्टरवर खरीप पिकांची पेरणी झाली आहे. यात १ लाख ३३ हजार हेक्टरवर ऊस; तर ९४ हजार १२७ हेक्टर क्षेत्रावर भुईमूग आणि सोयाबीनची पेरणी झाली. आता भात, भुईमूग व सोयाबीन परिपक्व होऊन कापणीसाठी आले आहे.
आठवड्यापूर्वी झालेल्या जोरदार पावसाने आणि काल झालेल्या पावसामुळे यापैकी हजारो हेक्टर भात, भुईमूग आणि सोयाबीनला फटका बसला आहे. काही ठिकाणी खळ्यात मळणीसाठी आलेला भात भिजू नये, यासाठी शेतकऱ्यांना कसरत करावी लागली. या आधीच्या पावसाने भुईमूग आणि सोयाबीन शेतात साचलेल्या पाण्यामुळे पिकांना नव्याने कोंब फुटणार आहेत. याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसणार आहे.
पीक काढणीदरम्यान येत असलेला पाऊस नुकसानकारक ठरत असला, तरी ज्यांनी उशिरा पेरणी केली आहे. त्यांना मात्र काहीसा उपयुक्त ठरत आहे. पण आणखी आठ ते दहा दिवस पाऊस झाल्यास या पिकांनाही फटका बसू शकतो, असे शेतकऱ्यांनी सांगितले.