जळगाव : पावसामुळे वेचणीवर आलेल्या कपाशीसह सोयाबीन, केळी पिकाचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी वीज पडून हानी झाली असून, ऐन सणासुदीच्या काळात शेतकरी अडचणीत सापडले आहेत. परंतु, हा पाऊस रब्बी हंगामासाठी काहीसा लाभदायक असल्याचेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
जिल्ह्यात मागील दोन, तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. ढगाळ वातावरणाच्या भीतीने वेचणीवर आलेल्या कापसाच्या शेतात मजुरांची संख्या शेतकऱ्यांनी वाढवून घेतली. अधिक मजुरीचे देण्याचे वायदे या वातावरणामुळे शेतकऱ्यांना करावे लागले. अशातच शनिवारी (ता.७) व रविवारी (ता. ८) जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाऊस झाला. जामनेर, धरणगाव, चाळीसगाव, जळगाव आदी ठिकाणी पाऊस झाला.
रविवारी मध्यरात्रीनंतर जळगाव लगतच्या भागात जोरदार सरी कोसळल्या. सुसाट वारा नव्हता, पण पावसामुळे उमललेली बोंडे काळवंडली आहेत. तसेच कपाशी लोळू लागली आहे. जवळपास तासभर पाऊस झाला. अनेक ठिकाणी मका काढणीवर आल्याने कणसे खुडण्याचे काम सुरू होते. तर अनेक ठिकाणी ज्वारीची कापणी सुरू झाली होती. रावेर, यावल, चोपडा भागात ज्वारीची कापणी काही शेतकऱ्यांनी केली होती. मका व ज्वारी जमिनीवर पडले आहेत. त्यावर पाऊस झाल्याने ते भिजून नुकसान झाले आहे. पुन्हा पाऊस आला तर ज्वारीला कोंब फुटतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
पण कोरडवाहू कपाशी, ताग या पिकांना मात्र काहीसा दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे मात्र रब्बी हंगामातील पेरणीला आणखी वेग येऊ शकतो. अनेकांनी रब्बीसाठी शेती तयार केली होती. पुरेसा ओलावा हवा होता. तो या पावसाने मिळाल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांमध्ये उमटत आहेत.
धरणगाव तालुक्यातील साकरे, साळवा, पिशाणे, पिंपळे, अमळनेर तालुक्यातील निमझरी, दहिवद, सोनखेडी, एरंडोल तालुक्यातील कासोदा, आडगाव, उमरे, सोनबर्डी, हणुमंतखेडे आदी भागातही जोरदार पाऊस झाला. या भागातही कपाशीचे मोठे नुकसान झाले आहे. पिंप्री खुर्द, उंबरखेड, देवळी, दशेगाव, चिंचखेडे (ता. चाळीसगाव) या पूर्वहंगामी कपाशीला फटका बसला आहे. तर कोरडवाहू कपाशीला लाभ झाला आहे. परंतु, कोरडवाहू कपाशीत पातेगळ मोठ्या प्रमाणात झाल्याची माहिती आहे.