नाशिक : जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून परतीच्या पावसाची सुरू असलेली रिपरिप खरीप हंगामातील तयार पिकांना धोकादायक ठरण्याची शक्यता वाढली आहे. सोयाबीन आणि बाजरी सोंगणीच्या टप्प्यात असल्याने पावसामुळे ती काळवंडणार आहे. सोयाबीन शेंगांना तडे जाऊन बी गळून जाणार असल्याची भीती व्यक्त होत आहे.सोंगणी केलेल्या बाजरीच्या कणसांना चौरे फुटण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण, दुपारी पावसाची जोरदार सुरवात तर रात्री गारठ्याचा प्रभाव असल्याने विषम हवामानाचा अनुभव येत आहे. त्याचा फटका खरीप हंगामातील पिकांना आता बसू लागला आहे.
जिल्ह्यातील पूर्व भागात बाजरी, कापूस, तूर, मका आणि सोयाबीन लागवडीचे क्षेत्र सर्वाधिक आहे. सिन्नर, निफाड भागातही बाजरी काही प्रमाणात आहे. पावसाची रिपरिप कायम आहे. शिवारात काही प्रमाणात बाजरी असून सोंगणी होणे बाकी आहे. पाऊस सतत होत असल्याने उभ्या बाजरीला त्याचा फटका बसण्यास सुरवात झाली आहे. बाजरीचे ताटवे वाकून पडल्यामुळे कणसे खराब होऊन बाजरीचा दर्जा खालवणार आहे. सोंगणी करून तयार करण्यासाठी शेतात झाकून ठेवण्यात आलेल्या बाजरीच्या कणसांना कोंब फुटून बाजरीच्या दाण्यांना त्यामुळे धोका पोचणार आहे. त्यामुळे बाजरी उत्पादक शेतकरी परतीच्या पावसाने चिंताग्रस्त झाले आहेत.
सोयाबीन पिकाला शेवटच्या टप्प्यात सोंगणीवेळीच पावसाने झटका दिला. सोयाबीनच्या शेंगा वाळलेल्या असताना त्या तडकून त्यातील दाणे शेतात गळून पडण्याचे प्रकार पावसामुळे घडत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. त्याचबरोबर पावसाने ओले झालेले सोयाबीन काळे पडणार असून त्याचा दर्जा खालावणार आहे. त्यामुळे आर्थिक नुकसान होणार असल्याची चिंता जिल्ह्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी व्यक्त करीत आहेत.
लाल कांद्याची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांनी कांदा रोपे तयार केली आहेत. या कांद्याची लागवड शेतकऱ्यांनी काही प्रमाणात केली आहे. मात्र, सतत पाऊस होत असल्याने लाल कांद्याची शेतात लावलेली रोपे पावसाच्या पाण्याने तळे झाल्यामुळे जमिनीत रुजत नसल्याचे चित्र आहे. कांद्याची रोपे लागवड केल्यानंतर मुळे धरत नसल्याने परतीच्या पावसामुळे नुकसान झाले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.