अकोला ः उन्हाची तीव्रता वाढल्याने वन्य प्राण्यांची धाव नागरी वस्त्यांकडे वाढली असून, हे प्राणी शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने जगविलेली पिके उदध्वस्त करीत अाहेत. अगदी काढणीला अालेल्या पिकांचे हे वन्य प्राणी नुकसान करत असल्याने शेतकऱ्यांना हजारोंचा फटका बसत अाहे.
पातूर तालुक्यातील राहेर परिसरात गेल्या काही दिवसांपासून रानडुक्कर, रोही व इतर वन्य प्राण्यांनी धुडगूस घातला अाहे. यामुळे काढणीला अालेले टरबूज, काही दिवसांपूर्वीच लागवड केलेली केळी, भुईमूग अादी पिकांचे नुकसान होत आहे.
दरवर्षी उन्हाळा लागला की प्राणी गावांकडे येऊ लागतात. या वर्षी पातूर तालुक्यातील राहेर भागात उन्हाळी पिकांचे लागवड क्षेत्र बऱ्यापैकी अाहे. २० ते ३० रानडुकरांचा कळप रात्रीच्यावेळी पिकांचे नुकसान करीत आहे. हा कळप शेतातील पिके जमीनदोस्त करीत अाहे.
रोही हे भुईमूग पिकांत धुमाकूळ घालतात. मागील काही हंगामांपासून या भागातील शेतकरी भुईमूग पिकाच्या नुकसानीमुळे आर्थिक संकटात सापडलेले आहेत. या वर्षी हे पिक चांगले दिसत असून, वन्य प्राण्यांमुळे शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडणार असल्याचे चित्र आहे.
शेतकरी दिवसभर राबल्यानंतर रात्रीसुद्धा पिक वाचवण्यासाठी शेतात जात अाहेत. रात्री शेतकऱ्यांवर प्राण्यांकडून हल्ले होण्याची भीती अाहे. याकडे संबंधित विभागाने गांभीर्याने लक्ष देऊन वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली अाहे.