पुणे ः रब्बी हंगामातील पिकांची नुकसानभरपाई निश्चित करण्यासाठी शासन दरवर्षीप्रमाणे यंदाही पीक कापणी प्रयोगावर भर देत आहे. चालूवर्षी जिल्ह्यातील महसूल मंडळात रब्बी हंगामातील सर्व पिकांचे पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत दोन हजार ९६ पीक कापणी प्रयोग घेण्यात येत असल्याची माहिती कृषी विभागाच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या सूत्रांनी दिली.
पिकांच्या हेक्टरी सरासरी उत्पादनाचे जिल्हा व राज्य पातळीवर विश्वासार्ह अंदाज काढणे, नुकसानभरपाई निश्चित करण्यासाठी तीन ते पाच वर्षांच्या सरासरी उत्पन्नाची आकडेवारी उपलब्ध करणे, पिकांची पैसेवारी निश्चित करण्यासाठी तालुका पातळीवर दहा वर्षांची पिकांच्या सरासरी उत्पन्नाची आकडेवारी उपलब्ध करणे, पीकविमा योजनेसाठी मंडळस्तरावरील चालू वर्षी मिळालेल्या पिकांच्या दर हेक्टरी उत्पादनाची माहिती पीकविमा कंपनीस कळविण्यासाठी दरवर्षी पीक कापणी प्रयोग घेण्यात येतात.
त्यासाठी कृषी विभागातील सर्व स्तरांवरील अधिकारी पिकांच्या उत्पादनाचा रॅंण्डम पद्धतीने अंदाज काढतात. या वेळी महसूल विभागाचे तलाठी, जिल्हा परिषदेचे ग्रामसेवक आदी उपस्थित असतात.
पीक कापणी प्रयोगामध्ये जिरायती व बागायती गहू, हरभरा आदी पिकांचे पीक कापणी प्रयोग सुरू आहे. ज्वारी आणि हरभरा पीक कापणी झाली आहे. सर्व पिकांची माहिती ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी व नॅशनल इन्शुरन्स कंपनीला लवकरच सादर केली जाणार आहे. तसेच जिल्हा अधीक्षक कार्यालयाने हरभरा पिकाची माहिती १५ मेपर्यंत तर गहू पिकाची माहिती ३१ मेपर्यंत कृषी आयुक्त कार्यालयाकडे पाठविणे गरजेचे आहे.