पीक काढणी, मळणीसाठी शेतकऱ्यांची धावपळ

काढणी झालेली पिके झाकण्यासाठी लगबग
काढणी झालेली पिके झाकण्यासाठी लगबग
सातारा  : जिल्ह्यात शनिवारी (ता. २१) सकाळपासून ढगाळ हवामान असल्यामुळे शेतकऱ्यांची पिके काढणी, मळणी कामांसाठी धावपळ सुरू झाली.
परतीच्या पावसाने जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून उघडीप दिल्याने खरिपातील पिके काढणीस प्रारंभ झाला होता. मात्र शनिवारी हवामानात बदल झाला आहे. या अगोदरच परतीच्या पावसामुळे पिके कुजून उत्पादनात घट झाली आहे. त्यात पुन्हा पाऊस येण्याची चिन्हे दिसू लागल्याने काढणीला आलेली पिके घरी नेण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. पीक काढणीमुळे शेतकऱ्यांना दिवाळीसारखा प्रमुख सण शेतात साजरा करावा लागत आहे. शनिवारी भाऊबीज असतानाही शेतकरी शेतीकामात व्यस्त होते.
सध्या सोयाबीन पिकाची काढणी सुरू असून काढणीबरोबरच मळणी करण्यावर भर दिला जात आहे. सोयाबीन खरेदी व्यापाऱ्यांकडून बंद असल्याने सोयाबीन घरात ठेवण्याची वेळ आली आहे. सणात मजूर मिळत नसल्याने शेतकऱ्यांची अडचण होऊ लागली आहे. उशिरा पेरण्या झालेल्या पिकांची अवस्था अजून चांगली आहे, मात्र आता पुन्हा पाऊस झाल्यास ज्वारी, बाजरी, भुईमूग, सोयाबीन, भात या पिकांचे मोठे नुकसान होणार आहे.
खरीप हंगामाच्या प्रारंभी सोयाबीन पिकांबाबत अनेक अफवा पसरल्यामुळे सोयाबीन पिकांच्या पेरणीस उशीर झाला होता. अफवांचे निराकरण झाल्यावर सोयाबीन पेरणी मोठ्या प्रमाणात म्हणजे ७३ हजार हेक्‍टर क्षेत्रावर झाली होती. किमान आधारभूतपेक्षा कमी दराने सोयाबीनची खरेदी केल्यास कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाकडून दिल्याने व्यापाऱ्यांकडून खरेदी बंद करण्यात आली आहे. सर्व उत्पादित सोयाबीनची खरेदी किमान आधारभूत किमतीपेक्षा जास्त दराने झाली नाही तर पुढील खरीप हंगामात सोयाबीनच्या क्षेत्रात घट होणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com