परभणीत खरीप पीक विमा परताव्याचा घोळ मिटेना

बॅंक खात्यातील तपशीलामधील चुकांच्या दुरुस्तीसाठी शेतकऱ्यांच्या तक्रारी घेतल्या आहेत. विमा कंपनीच्या प्रतिनिधीस शेतकऱ्यांनी सहाकार्य करणे आवश्यक आहे. तरच परताव्याची रक्कम खात्यावर जमा करता येईल. - बाळासाहेब शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, परभणी.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

परभणी  : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत गतवर्षीच्या खरीप हंगामातील पिकांच्या नुकसानीबाबत जिल्ह्यातील ३ लाख ८८ हजार ९६२ शेतकऱ्यांना १४७ कोटी ६४ लाख ६ हजार १०३ रुपयांचा परतावा मंजूर करण्यात आला. त्याबाबतची माहिती विमा कंपनीने कृषी विभागाकडे सादर केली आहे. परंतु परताव्याची संपूर्ण रक्कम लाभार्थी शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा केल्याचा अहवाल मात्र कृषी विभागाकडे सादर केलेला नाही. बॅंक खात्यांच्या माहितीमधील चुकांमुळे विमा परताव्याची तब्बल १ कोटी रुपये रक्कम बॅंक खात्यावर जमा झाली नसल्याने ३ हजारांवर शेतकरी नुकसानीच्या भरपाईपासून अद्याप वंचित आहेत.

पीकविमा परताव्यासंबंधित तक्रारींचा निपटारा करण्यासाठी गेल्या आठवड्यामध्ये जिल्ह्यात तालुक्यांच्या ठिकाणच्या भारतीय स्टेट बॅंकेच्या शाखांमध्ये रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते. पालम, गंगाखेड, सोनपेठ या ठिकाणी कॅम्प घेण्यात आले. परंतु तेथे गोंधळाची स्थिती निर्माण झाल्यामुळे अडचणी आल्या. त्यानंतर सुट्ट्यामुळे अन्य ठिकाणचे कॅम्प रद्द करण्यात आले.

गतवर्षीपासून पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत परतावा मंजूर झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या बॅंकेत न लावता थेट शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर परताव्याची रक्कम जमा केली जात आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी विमा प्रस्तावासोबतच आधार संलग्न बॅंक खाते क्रमांकाची माहिती विमा कंपनीकडे सादर केलेली आहे. परंतु, विमा प्रस्ताव अपलोड करतांना बॅंक कर्मचारी तसेच सामुदायिक सेवा केंद्रावर शेतकऱ्यांच्या बॅंक खात्याची अचूक माहिती भरण्यात आलेली नाही. त्याचा फटका पीकविमा मंजूर झालेल्या ३ हजारांहून अधिक लाभार्थी शेतकऱ्यांना बसला असून, त्यांची १ कोटी रुपये परताव्याची रक्कम अडकून पडली आहे.

त्याचप्रमाणे सोनपेठ तालुक्यातील शेतकऱ्यांना एकाहून अधिक पिकांचा परतावा मंजूर करण्यात आलेला आहे. परंतु विमा कंपनीकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर केवळ एकाच पिकांचा परतावा जमा केल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे पीक परताव्याची रक्कम जमा होण्यास बॅंक खात्यातील चुका, की विमा कंपनी टाळटाळ करत असल्यामुळे अडचण येत आहेत याची कृषी विभागासह जिल्हा प्रशासनाने शहानिशा करणे आवश्यक आहे. अन्य तालुक्यांंतील शेतकऱ्यांच्या तक्रारी घेण्यासाठी कॅम्प घेण्याची गरज आहे. तरच लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यावर परतावा जमा होण्यातील अडथळे दूर होतील.

सोयाबीन, उडीद, मूग या पिकांचा परतावा मंजूर असताना अनेक शेतकऱ्यांच्या खात्यावर केवळ एकाच पिकाचा परतावा जमा केलेला आहे. बॅंक खात्याच्या अचूक तपशिलामुळेच विमा कंपनीला एका पिकाची रक्कम जमा करता आली. तशी अन्य पिकांची का करता येत नाही. शेतकऱ्यांकडे परत बॅंक खात्याचा तपशील मागणे म्हणजेच विमा कंपनीकडून परतावा देण्यासाठी जाणीपूर्वक टाळाटाळ करणे होय, असे शेतकरी संघटनेचे सोनपेठ तालुकाध्यक्ष विश्वंभर गोरवे  यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com