अकोला ः खरीप हंगाम सुरू होण्यास अवघे काही दिवस शिल्लक असताना पीककर्ज वाटपाने अद्यापही गती घेतलेली नाही. जिल्ह्यात अातापर्यंत केवळ २१४ कोटींचे कर्जवाटप झाले असून, जिल्हा बँकेने यात अाघाडी घेतलेली दिसून येते.
अकोला जिल्ह्यात १३३७ कोटींचे पीककर्ज वाटप केले जाणार अाहे. यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ६८३ अाणि सर्व राष्ट्रीयीकृत बँका मिळून ६८६ कोटींचे पीककर्ज वाटप करण्याचा लक्ष्यांक देण्यात अाला अाहे. अातापर्यंत या दोन्ही बॅंकांनी मिळून २१४ कोटींचे कर्जवाटप केले अाहे. जून महिना अवघा १५ दिवसांवर येऊन ठेपलेला असताना २५ टक्केसुद्धा पीककर्ज वाटप झालेले नाही.
जिल्हा बँकेने १०६ अाणि राष्ट्रीयीकृत बँकांनी १०८ कोटींचे पीककर्ज वाटप केले. जिल्ह्यातील २२ हजार ९८५ शेतकऱ्यांना २१४ कोटींचे पीककर्ज वाटप झाले अाहे.
जिल्ह्यातील शेतकरी सध्या मशागतीच्या कामांमध्ये गुंतले अाहेत.
शेतकरी कर्जमाफी प्रक्रिया राबवली जात असल्याने बँकाकडून (विशेषतः राष्ट्रीयीकृत) नवीन कर्जवाटप करण्यास सध्या तितकीशी उत्सुकता दाखवली जात नाही. शेतकरी बँकांमध्ये जाऊन कर्जमाफी झाली काय, नवीन कर्ज कधी मिळेल याची विचारणा करताना दिसतात.
बँकांनी कर्जमुक्त झालेल्या शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध कराव्यात असे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले अाहेत. परंतु याद्या अद्याप अपूर्ण असल्याने प्रसिद्ध झालेल्या नाहीत. जिल्हा बँकेने कर्जमाफी मिळालेल्यांना मेसेज पाठविल्याने या बँकेच्या कर्जमुक्त झालेल्या खातेदारांना दिलासा मिळाला. इतर बँकांनी मात्र तसे काही केलेले नाही.
परिणामी शेतकरी अद्यापही संभ्रमात अाहेत. नवीन हंगामासाठी शेतकऱ्यांना बियाणे, खते खरेदीसाठी पैशांची गरज अाहे. सध्या हजारो शेतकऱ्यांची तूर अाणि हरभरा घरातच पडून अाहे. विक्री केलेल्या तूर, हरभऱ्याचे चुकारेसुद्धा रखडलेले असल्याने पैशांची तजवीज करताना अडचणी अाहेत.