सोलापुरात पीककर्ज वाटप अवघ्या १४ टक्‍क्‍यांवर

सोलापुरात पीककर्ज वाटप अवघ्या १४ टक्‍क्‍यांवर
सोलापुरात पीककर्ज वाटप अवघ्या १४ टक्‍क्‍यांवर

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात खरीप हंगामासाठी पीककर्ज वाटपाची गती अगदीच कमी आहे. जिल्हा बॅंक, राष्ट्रीयीकृत बॅंकेसह शेतीसाठी कर्जपुरवठा करणाऱ्या जवळपास ३२ बॅंकांपैकी ४ बॅंकांनी अद्याप एक रुपयाचेही कर्जवाटप केलेले नाही. उर्वरित बॅंकांकडूनही फक्त १४  टक्‍क्‍यांपर्यंतचे कर्जवाटप झाले आहे. एकूच जिल्हा प्रशासनाचा वचक नसल्यानेच बॅंका कर्जवाटपासाठी चालढकल करत असल्याचे दिसून येत आहे.

गेल्या आठवड्यात जिल्ह्यात काही भागात दमदार पाऊस झाला आहे. त्यामुळे खरिपाच्या पेरणीसाठी शेतकऱ्यांनी घाई सुरू केली आहे. या हंगामात विविध पिकांसाठी खते, बी-बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांना पैशाची गरज असते. मात्र बॅंकांकडून त्यांना कर्ज पुरवठा होत नसल्याने ते अडचणीत आले आहेत.  

गेल्या दोन वर्षात एकूण शेतीच्या पतआराखड्याच्या जवळपास ७० टक्के रक्कम फक्त शेतीसाठी राखीव करण्यात आली आहे. यंदाही १ हजार ३८६ कोटी ८४ लाखांची तरतूद  केली आहे. या तरतूदीत आणि वाटपाच्या आकडेवारीत मोठी तफावत आहे. पीक कर्जासाठी बॅंका स्वतःहून पुढाकार घेत नाहीत. तसेच प्रशासनालाही जुमानत नसल्याचे चित्र दिसून येते.

जिल्ह्यात एक लाख ५० हजार ५५० खातेदार शेतकरी आहेत. त्यापैकी यंदाच्या खरिपात आतापर्यंत २१ हजार १७४ शेतकऱ्यांना कर्जवाटप झाले आहे. त्यात जिल्हा बॅंकेसह राष्ट्रीयीकृत बॅंकांकडून २८२ कोटी ८८ लाख रुपयांचे कर्जवाटप केले आहे. हा आकडा कधी आणि कसा वाढणार, याबाबत शंकाच आहे.

  • कर्जमाफी झालेल्यांना पुन्हा कर्ज नाही
  • कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांना प्राधान्याने कर्जवाटप करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. परंतु राष्ट्रीयीकृत बॅंकांनी अद्यापही बहुतांशी शेतकऱ्यांना नव्याने कर्ज दिलेले नाही, ही आकडेवारी अगदी बोटावर मोजण्याइतपत आहे. त्यातही जिल्हा बॅंकेकडूनच थोड्याफार प्रमाणात अशी कार्यवाही झाली आहे.

  • चार बॅंकांची कर्जवाटपासाठी ‘ना’
  • शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाबाबत जिल्हा प्रशासनासह लीड बॅंक सातत्याने सूचना देते. वारंवार बैठका, पाठपुरावा केला जातो. तरीही बॅंका कोणालाच जुमानत नाहीत, असे चित्र आहे. जिल्ह्यातील ३२ बॅंकांपैकी पंजाब नॅशनल बॅंक, युनायटेड बॅंक ऑफ इंडिया, इंड्‌स इन्ड बॅंक आणि कोटक महिंद्रा बॅंकेने खरीप हंगामात एकाही शेतकऱ्याला कर्जवाटप केलेले नाही.

  • ‘अर्ज द्या, कर्ज घ्या’चा हा नुसता फार्स
  • गतवर्षी सहकार विभागाने जिल्ह्यात विविध ठिकाणी ‘अर्ज द्या व कर्ज घ्या’ असे अभियान राबवून शेतकऱ्यांना बॅंकांच्या कर्जाची सोय केली. पण यंदा  काही ठराविक बॅंका सोडल्या तर सरसकट कर्ज उपलब्ध करून दिलले नाही. यंदाही या मेळाव्याचे आयोजन जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने तालुकास्तरावर १९ ते ३१ मे या कालावधीत केले. पण सध्याची गती पाहता, हे अभियानही फार्स ठरत आहे.

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com