पुणे विभागात पीक उत्पादनात ४० टक्क्यांपर्यंत घट येणार : कृषी विभाग

पीक उत्पादनात ४० टक्क्यांपर्यंत घट येणार
पीक उत्पादनात ४० टक्क्यांपर्यंत घट येणार

पुणे ः पावसाचे चार महिने संपले तरीही बहुतांशी ठिकाणी पाऊस झालेला नाही. त्यातच अनेक वेळा पडलेल्या पावसाचा खंडाचा परिणाम खरीप पिकांवर झाला आहे. पुणे विभागातील अनेक ठिकाणी पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली असून, पीक उत्पादनात सुमारे ४० टक्क्यांपर्यंत घट येण्याची शक्यता कृषी विभागाच्या सूत्रांनी वर्तविली आहे.

पुणे विभागात जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीत अवघा ४३५ मिलिमीटर म्हणजेच ६८ टक्के पाऊस पडला आहे. यात जून महिन्यात प्रत्यक्षात ११४.३ मिलिमीटर, जुलैमध्ये १६८.४, आॅगस्टमध्ये १२२.८, सप्टेंबरमध्ये ३०.१ मिलिमीटर पाऊस पडला आहे. जून महिन्यात विभागातील अनेक भागात बऱ्यापैकी पाऊस झाला होता. त्यामुळे खरीप हंगामात सरासरी सात लाख ८८ हजार ४८० हेक्टर क्षेत्रापैकी ९ लाख ३४ हजार ७३० हेक्टर म्हणजेच ११८ टक्के पेरणी झाल्याची नोंद कृषी विभागाकडे आहे. मात्र, जुलै, आॅगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्यांत पावसाच्या कालावधीत चांगलाच खंड पडला असून, कमी कालावधीत अधिक पाऊस पडल्याचे चित्र होते. त्याचा परिणाम खरीप हंगामातील पिकांवर झाला आहे.

नगर जिल्ह्यात अकोले तालुक्यात भातपीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असून, पावसातील मोठ्या खंडामुळे उत्पादनात जवळपास २५ ते ३० टक्के घट येण्याची शक्यता आहे. बाजरी पीक काढणी अनेक ठिकाणी सुरू आहे. मका पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत आहे. पाण्याची सुविधा असलेले शेतकरी संरक्षित पाणी देत आहे.

बाजरी व मका पिकांच्या उत्पादनात सुमारे २५ ते ३५ टक्के घट येण्याची शक्यता आहे. तूर पिकांला फुले येण्याच्या अवस्थेत असून, काही ठिकाणी शेंगा लागण्याच्या अवस्थेत आहे. मूग व उडीद पिकांची काढणी पूर्ण झाली आहे. या पिकांच्या उत्पादनात सरासरी ४० ते ४५ टक्के घट येण्याची शक्यता आहे.

भुईमूग व सूर्यफूल पिकांचीही वाढ खुंटली असून, उत्पादनात सुमारे ३० ते ४० टक्के घट येण्याची शक्यता आहे. पुणे जिल्ह्यातही भातपीक निसवण्याच्या अवस्थेत असून, अनेक ठिकाणी करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यातच पावसाचा खंड यामुळे उत्पादनात २५ ते ३० टक्क्यांपर्यंत घट येण्याची शक्यता आहे. बाजरी पीक दाणे भरण्याच्या अवस्थेत असून, पावसाच्या खंडामुळे पीक उत्पादनात जवळपास २० ते २५ टक्के घट येण्याची शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्यातील ९१ महसूल मंडळांपैकी ५६ मंडळांत सरासरी ५० टक्क्यांपेक्षा कमी पाऊस झाला. त्यामुळे सर्वच पिकांच्या उत्पादनात मोठी घट येणार आहे.

‘मी वीस जूनच्या दरम्यान आठ ते नऊ एकरांवर मुगाची पेरणी केली होती. त्यानंतर थोडा पाऊस झाला. शेंगा लागणीच्या अवस्थेत असताना पावसाचा खंड पडला. त्यामुळे सर्व मूग वाळून गेल्यामुळे त्यात थेट नांगर फिरवला. - भाऊसाहेब पळसकर, करर्डे, ता. शिरूर, जि. पुणे

‘खरिपात दोन ते अडीच एकरावर बाजरीची पेरणी केली होती. जुलै आॅगस्टमध्ये पुरेसा पाऊस न झाल्याने बाजरीची वाढ होऊ शकली नाही. त्यामुळे उत्पादनात सुमारे २० ते २५ टक्के घट येणार आहे. - फत्तेसिंग पवार, वाल्हा, ता. पुरंदर, जि. पुणे

 ‘खरिपात पाच एकरावर मुगाची पेरणी केली होती. मात्र, वेळेवर पाऊस झाला नाही. त्यामुळे उत्पादनात मोठी घट झाली असून, पाच एकरांत अवघे दहा क्विंटल उत्पादन मिळाले आहे. - विनायक लगड, वाळवणे, ता. पारनेर, जि. नगर.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com