अकोला : वऱ्हाडात प्रामुख्याने अकोला, बुलडाणा जिल्ह्यात बहुतांश भागात पावसाने दहा ते १५ दिवसांपासून विश्रांती घेतल्याने अडचणी वाढू लागल्या आहेत. बऱ्याच ठिकाणी जुलैच्या शेवटच्या आठवड्यापासून पाऊस झालेला नाही. तिनही जिल्ह्यांमध्ये पेरणी आटोपली असून, पावसाअभावी पिकांच्या वाढीवर विपरित परिणाम दिसू लागला आहे. वऱ्हाडात अकोला, बुलडाणा जिल्ह्यात २५ जुलैनंतर पावसाने विश्रांती घेतली आहे. याआधी पडलेला पाऊसही संपूर्ण बुलडाणा जिल्हा व अकोला जिल्ह्यातील तेल्हारा, अकोट या तालुक्यांमध्ये अल्प आहे. वऱ्हाडातील बहुतांश भागाला दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. शिवाय तापमानातही वाढ झाली आहे. भारी जमिनीत आोल टिकून असली तरी हलक्या प्रतीच्या जमिनीवरील पिकांची स्थिती बिकट आहे. पिके पिवळी पडणे, दुपारच्या सुमारास सुकणे, वाढ थांबणे अशी लक्षणे दिसत आहेत. सोयाबीनवर पाने खाणारी अळी, कपाशीवर रसशोषक किडींसह मॉन्सूनपूर्व लागवड असलेल्या क्षेत्रात बोंड अळी दिसून आली आहे. पावसाचा हा खंड कमी कालावधीच्या सोयाबीन, मूग, उडीद या पिकांसाठी बाधक होऊ शकतो. ही पिके फुलोरावस्थेत असल्याने नेमका याच टप्प्यात पावसाची विश्रांती असल्याने परिणाम जाणवत आहे.
बाळापूर तालुक्यात गेल्या तेरा दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. या जमिनीला तडे जात असून पाण्याअभावी शेतात उभ्या पिकांची कोवळी रोपटी सुकू लागली, तर मूग पिकावर कीडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. या तालुक्यात सुरवातीलाच पेरणी झाली होती. तालुक्यात हातरुण सर्कलमध्ये अत्यंत कमी पाऊस झालेला असून सर्वच पिके धोक्यात आली आहेत.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.