हापूस आंबा वाहतुकीतून कोट्यवधींची उलाढाल

आंबा वाहतूक
आंबा वाहतूक

रत्नागिरी : कोकणच्या हापूसची सर्वाधिक विक्री मुंबई, पुणे बाजारपेठेत होते. बागायतदारांकडील हापूसच्या पेट्या एकत्रित करून त्या वाहतूक कंपनीमार्फत बाजारात पाठविण्यात येतात. हंगामातील तीन महिन्यांत या वाहतुकीतून कोट्यवधीची उलाढाल रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांत होते. गाडी नेण्यासाठी चालक नेमला तर त्यालाही एका फेरीला किमान दीड हजार रुपये मानधन दिले जाते, तर चारचाकी गाडी मालकाला किमान साडेतीन ते चार हजार रुपये भाडे मिळते.  कोकणची अर्थव्यवस्था अवलंबून असलेल्या आंबा व्यवसायातून हजारो कोटींची दरवर्षी उलाढाल होते. मार्चपासून हंगाम सुरू होतो. बागेतून काढलेला आंबा गोडावूनला असून पेटी किंवा बॉक्‍समध्ये भरला जातो. ती पेटी मुंबई, पुण्यातील बाजारात पाठविण्यात येते. त्यासाठी वाहतूक कंपनीचे सहकार्य घेतले जाते. बाजारपेठेत सकाळच्या सत्रात आंब्याची खरेदी-विक्री होते. त्यामुळे रात्री १२ वाजण्याच्या सुमारास रत्नागिरीच्या विविध भागांतून पेट्या भरलेल्या गाड्या रवाना होतात. एका पेटीसाठी ९० रुपये आणि दहा रुपये कामगाराचे आकारतात. गाडी मालक नसला तरी तात्पुरता चालक तिथे पाठविला जातो. मालक स्वतः असेल तर फायदा अधिक होतो. हौदा असलेल्या चारचाकी गाडीतून सुमारे १३० पेट्या नेण्यात येतात. मोठ्या गाड्यांमधून तीनशे, पाचशे तर ट्रकमध्ये अधिक पेट्या भरल्या जातात. आंबा वाहतुकीतून हंगामात वाहन मालक-चालक लाखो रुपये कमवतात. चारचाकी गाडीच्या एका फेरीला किमान दहा ते बारा हजार रुपये मिळतात. इंधन, चालकाचा पगार यासह गाडीचा घसारा खर्च वगळून चार ते साडेचार हजार रुपये सुटतात. मोठी गाडी असेल तर सुमारे बारा ते पंधरा हजार रुपये मिळतात. यामध्ये वर्षाचा हप्ता दोन महिन्यांत कमवण्यावर भर असतो. यावर्षी उत्पादन कमी असल्यामुळे वाहतुकीच्या फेऱ्यांवरही परिणाम झाला आहे.  धोकाही अधिक  गाडीमध्ये वजन असल्यामुळे वाहतूकदार, गाडीचा मालक आणि चालक यांची तेवढीच जबाबदारी राहते. उन्हाळी सुट्यांमुळे महामार्गावर वाहनांची संख्या अधिक असते. अनेक गाड्यांचे अपघातही होतात. हा धोका पत्करूनच हा व्यवहार सुरू असतो. तसेच बागायतदारांच्या पेट्यांची माहिती लिखित स्वरूपात दलालाकडे दिली जाते. एखादी पेटी अधिक गेली, तर ती दलाल स्वीकारत नाहीत.  प्रतिदिन ३००० पेट्यांची उलाढाल आंबा ट्रान्सपोर्ट करणारे रत्नागिरी तालुक्‍यात सुमारे बारा ते पंधरा व्यावसायिक आहेत. चिपळूण, दापोलीसह अन्य तालुक्‍यांतही काही प्रमाणात असे वाहतूकदार आहेत. सिंधुुदुर्ग जिल्ह्यातूनही अशी वाहतूक होते. सध्या दिवसाला एका वाहतूकदाराकडून सरासरी तीन हजार पेट्या मुंबई, पुण्याकडे रवाना होतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com