अल्पावधीतच संपला सीताफळाचा हंगाम

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नागपूर : वातावरणातील बदलाचा यावर्षी सीताफळाच्या हंगामाला चांगलाच फटका बसला. वातावरणात उकाडा वाढल्याच्या परिणामी महिनाभरापूर्वीच सीताफळ हंगाम संपला असून, उत्पादकांना यावर्षी अपेक्षित दर मिळू शकला नाही.

कोरडवाहू पीक म्हणून राज्यात सीताफळाखालील क्षेत्र लगतच्या काळात वाढीस लागले आहे. सुमारे ७० हजार हेक्‍टरवर आज राज्यात सीताफळ लागवड होते. विदर्भात हे क्षेत्र ७ हजार हेक्‍टरवर आहे. विदर्भातील बुलडाणा, अकोला, नागपूर, वर्धा हे जिल्हे सीताफळासाठी प्रसिद्ध आहेत.

१० ऑक्‍टोबरपासून सीताफळाचा हंगाम सुरू होत नोव्हेंबरअखेरपर्यंत फळे मिळतात. यावर्षी ९ ऑक्‍टोबरपासून फळ मिळण्यास सुरवात होत, २७-२८ ऑक्‍टोबरलाच हंगाम संपला. परिणामी एकाच वेळी फळे बाजारात आल्याने अपेक्षित दर सीताफळ उत्पादकांना मिळाला नाही.

यावर्षी अधिक काळ पाऊस असल्याने जमिनीत ओलावा वाढला आणि ढगाळ वातावरणामुळे फळे लवकरच परिपक्‍व झाली. दुपारी वातावरणात उकाडा वाढून त्यानंतर पाऊस पडत होता. वातावरणातील या बदलामुळेच सीताफळ बाजारात लवकर आली आणि हंगामदेखील लवकर संपुष्टात आला.

यावर्षी चांगल्या प्रतीच्या सीताफळाला ७५ ते ८०, त्याखालोखाल दर्जा असलेल्या फळांना ३५ ते ४५ व त्यानंतरच्या फळांना २५ रुपये प्रतिकिलोचा दर मिळाला. आता एका जिल्ह्यातील बाजारात सरासरी ७०० ते ८०० क्रेट आवक पाहिजे. सद्यःस्थितीत केवळ १०० क्रेटची आवक होत आहे. अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळ या सीताफळाच्या मोठ्या बाजारपेठा आहेत.

सीताफळ नाशवंत असल्याने तोडणीनंतर चार दिवसांत ते ग्राहकांपर्यंत पोचले पाहिजे. यावर्षी वातावरणातील बदलाचा फटका बसत सीताफळ हंगाम लवकर संपुष्टात आला. गेल्या २५ ते ३० वर्षांत असा प्रकार पहिल्यांदाच घडला आहे. - श्याम गट्टाणी, अध्यक्ष, सीताफळ महासंघ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com