साताऱ्यातील प्रमुख धरणांत ७१ टक्क्यांवर पाणीसाठा

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सातारा  ः जिल्ह्यातील सर्वत्र प्रमुख धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाला. परिणामी सर्व धरणे भरून वाहिली. सध्या या सर्व धरणांत ७१ टक्क्यांवर पाणीसाठा उपलब्ध असल्याने तो लाभक्षेत्रातील गावांना फायदेशीर ठरणार आहे.  

जिल्ह्यात जुलै, ऑगस्ट या महिन्यांत दमदार पाऊस झाल्याने सर्वच धरणे तुडुंब भरली होती. पाणीसाठा नियंत्रित राहाण्यासाठी कोयनेसह सर्वच धरणांतून पाण्याचा विसर्ग करावा लागला होता. यामुळे धरणातील पाणीपातळी समाधानकारक झाली होती. जिल्ह्यातील पूर्व भागात दुष्काळाच्या झळा तीव्र होत असतानाही धरणातील पाणीसाठा समाधकारक असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

कोयना धरण हे राज्यासाठी वीजनिर्मितीच्या दृष्टीने महत्त्वाचे धरण असून यात सध्या ८१.३७ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. यामुळे वीजनिर्मितीसह शेतीसाठी पाण्याची टंचाई भासणार नाही. तसेच ऐन उन्हाळात वीज भारनियमनात केली जाणारी वाढ टाळता येणार आहे. तसेच कोयना नदीवर अवलंबून असलेल्या पाणीपुरवठा योजनांनादेखील पाणी उपलब्ध होणार आहे.

उरमोडी धरण माण, खटाव तालुक्यांच्या दृष्टीने महत्त्वाचे धरण असून या धरणातही ७५.१७ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. दुष्काळी तालुक्यात या धरणाचे अनेक ठिकाणी पाणी पोचले असून काही ठिकाणी कामे बाकी असल्याने पाणी पोचणार नाही. मात्र ज्या ठिकाणी पाणी पोचले आहे अशा ठिकाणी टंचाई कमी होण्यास मदत होणार आहे.    

जिल्ह्यातील धरणांतील उपयुक्त पाणीसाठा (टीएमसी)
धरण उपयुक्त पाणीसाठा टक्केवारी
कोयना ८१.३७ ८१.२७
धोम ८.३०  ७१.०४
कण्हेर ८.२४  ८५.८५
उरमोडी ७.२५ ७५.१७
तारळी   ५.०१   ८५.८५
धोम-बलकवडी २.८८   ७२.६२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com