औरंगाबाद : मराठवाड्यातील ८६४ लघू, मध्यम, मोठ्या प्रकल्पांसह बंधाऱ्यांमधील उपयुक्त पाणीसाठा ३६ टक्क्यांवर आला आहे. मोठ्या प्रकल्पांपैकी येलदरी व उर्ध्व पैनगंगा प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठ्याने तळ गाठला आहे. दुसरीकडे निम्म मनार व विष्णुपुरी प्रकल्पातील पाणीही झपाट्याने घटत आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील सोळा मध्यम प्रकल्पांत केवळ ७ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.
मराठवाड्यात एकूण ८६४ प्रकल्पांपैकी ११ मोठ्या प्रकल्पांत ४० टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. यापैकी येलदरी प्रकल्पात ५ तर उर्ध्व पेनगंगा प्रकल्पात ४ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. ७५ मध्यम प्रकल्पांमध्ये ३६ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील १६ मध्यम प्रकल्पात केवळ ७ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.
लघू प्रकल्पांमधील पाणीसाठ्याची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. ७४३ लघू प्रकल्पांत केवळ २३ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यात हिंगोली जिल्ह्यातील २७ लघु प्रकल्पांमध्ये १२, परभणी जिल्ह्यातील २२ प्रकल्पात १०, नांदेड जिल्ह्यातील ८८ लघु प्रकल्पात १७, जालना जिल्ह्यातील ५७ प्रकल्पात १६, औरंगाबाद जिल्ह्यातील ९० प्रकल्पात १६, बीड जिल्ह्यातील १२६ प्रकल्पात ३०, लातूर जिल्ह्यातील १३२ प्रकल्पात २८ तर उस्मानाबाद जिल्ह्यातील २०१ लघू प्रकल्पातही केवळ २८ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.
गोदावरी नदीवरील ११ बंधाऱ्यांमध्ये ४८ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. गोदावरी नदीवर परभणी जिल्ह्यात मुळी येथे असलेल्या बंधाऱ्यात उपयुक्त पाणीसाठा संपुष्टात आला आहे. दुसरीकडे तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील २४ बंधाऱ्यांमध्ये २५ टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.
रेणापूर, घनसरगाव येथील बंधाऱ्यांमध्ये उपयुक्त पाणीसाठा शिल्लक नाही. बोरगाव, वांजरखेडा, खरोळा आदी ठिकाणच्या बंधाऱ्यांमधील उपयुक्त पाणीसाठा तळाला गेल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.
मराठवाड्यातील ७५ मध्यम प्रकल्पांपैकी दहा मध्यम प्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठा संपुष्टात आला आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील नऊ व नांदेड जिल्ह्यातील एका मध्यम प्रकल्पाचा समावेश आहे.