औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठा चिंताजनक स्थितीत असल्याचे चित्र आहे. ८६७ लघू, मध्यम, मोठ्या प्रकल्पांसह बंधाऱ्यांमध्ये केवळ ३२ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. ७४६ लघू प्रकल्पांत केवळ १८ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.
मराठवाड्यातील एकूण ७५ मध्यम प्रकल्पांपैकी १० प्रकल्पांत उपयुक्त पाणीसाठा शिल्लक नाही. औरंगाबाद, जालना, परभणी व हिंगोली जिल्ह्यातील लघू प्रकल्पांची तसेच औरंगाबाद व परभणी जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांमधील उपयुक्त पाण्याची टक्केवारी चिंता वाढवणारी आहे.
मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांत ३७ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामध्येही येलदरी व उर्ध्व पेनगंगा प्रकल्पात प्रत्येकी चार टक्के, तर निम्न मनार प्रकल्पात ११ टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. वाढत्या उन्हामुळे
मोठ्या प्रमाणात होणारे बाष्पीभवनदेखील पाणीसाठा घटण्यास कारणीभूत ठरत असल्याचे चित्र आहे. अनेक वर्षांनंतर यंदा पहिल्यांदाच शंभर टक्के भरलेल्या जायकवाडी प्रकल्पातील उपयुक्त पाणीसाठाही ६० टक्क्यांवर आला आहे.
हिंगोली वगळता सात जिल्ह्यांतील ७५ मध्यम प्रकल्पांमध्ये केवळ ३० टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामध्येही औरंगाबाद जिल्ह्यातील १६ मध्यम प्रकल्पांसह परभणी जिल्ह्यातील दोन मध्यम प्रकल्पांत अनुक्रमे ५ व १५ टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.
मराठवाड्यातील ७४६ लघू प्रकल्पांत केवळ १८ टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. यामध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील ९३ लघू प्रकल्पांत १२, जालना जिल्ह्यातील ५७ प्रकल्पांत १३, परभणी जिल्ह्यातील २२ प्रकल्पांत ९, तर हिंगोली जिल्ह्यातील २७ प्रकल्पांत केवळ ८ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.