नाशिक : रणरणत्या उन्हाने तापलेल्या जिल्ह्यातील प्रमुख २४ धरणांमध्ये आजमितीस ३५ टक्के, तर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणासह समूहात प्रत्येकी ४८ टक्के साठा उपलब्ध आहे. जिल्ह्यातील एकूणच उपलब्ध जलसाठा बघता तो जून अखेरपर्यंत पुरणार असल्याने नागरिकांसाठी ही दिलासादायक बाब आहे.
विशेष म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सरासरी तीन टक्के पाणीसाठा अधिक आहे. यंदा एप्रिल महिन्यातील पहिल्याच आठवड्यात जिल्ह्याचा पारा चाळिशीपर्यंत पोहोचला होता. सद्यःस्थितीत पारा ३८ अंशांवर आहे. वाढत्या उन्हाने नागरिक घामाघूम झाले आहेत. ग्रामीण भागात काही तालुक्यांमध्ये पाणीटंचाईचे चटके बसण्यास सुरवात झाली आहे. अशा ठिकाणी टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र, जिल्ह्यातील प्रमुख धरणांमध्ये पुरेसा साठा असल्याचे चित्र आहे.
दरम्यान, चोवीस धरणांमध्ये ३५ टक्के पाणी आहे. गतवर्षी याचकाळात हा साठा २०,२३७ दलघफू म्हणजेच ३० टक्के साठा होता. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात २७०५ दलघफू पाणीसाठा आहे. समूहातील चार प्रकल्पांत ४९५७ दलघफू साठा आहे.
जिल्ह्यातील दुसऱ्या महत्त्वाच्या दारणा समूहातील सात धरणांमध्ये आजमितीस ८२५९ दलघफू एवढा साठा आहे. त्यातही एकट्या दारणा धरणात ४७०१ म्हणजेच ६१ टक्के पाणीसाठा आहे. पालेखड समूहात २५१६ दलघफू (३० टक्के) तर ओझरखेड समूहात १०९३ दलघफू (३४ टक्के) साठा आहे. गिरणा खोऱ्यातील सात धरणांमध्ये ६९०० तसेच चणकापूर धरणात १२०३ दलघफू साठा आहे.
जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा यंदा तीन टक्के साठा अधिक आहे. यंदाच्या हंगामात धरणांमधून आवर्तने सोडण्यात आली आहे. आता मे महिन्याच्या मध्यात काही तालुक्यांसाठी प्रमुख धरणांमधून दोन ते तीन आवर्तने द्यावी लागणार आहे. त्यामुळे आजमितीस उपलब्ध पाण्याचा विचार केल्यास प्रमुख धरणांमधील पाणी हे जून अखेरपर्यंत पुरेल, अशी माहिती जलसंपदा विभागाकडून देण्यात आली आहे.