परभणी: वाढते तापमान, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग, उपसा यांमुळे जिल्ह्यातील लघु, मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठा झपाट्याने कमी होत चालला आहे. लघु प्रकल्पांमध्ये केवळ १० तर मध्यम प्रकल्पांमध्ये १८ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. लघु तलाव कोरडे पडत चालले आहेत. त्यामुळे जिंतूर, पालम, गंगाखेड तालुक्यातील डोंगराळ भागातील अनेक गावांत पाणीटंचाईचे स्वरूप गंभीर होत चालले आहे. पालम आणि पूर्णा तालुक्यांतील गावांना सहा टॅंकद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
गेल्या आठवड्यापासून जिल्ह्यातील तापमानात वाढ झाली आहे. ऊन, वाऱ्यामुळे बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे. शिवाय सिंचनासाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पांतून विविध प्रकारे उपसा सुरू आहे. त्यामुळे सर्वच प्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत चालली आहे. मोठा प्रकल्प असलेल्या येलदरी धरणातील उपयुक्त पाणीसाठा ५ टक्केपेक्षा खाली गेला आहे.
जिल्ह्यातील २२ पैकी झरी, पेडगांव, आंबेगांव, राणी सावरगांव, पिंपळदरी, देवगांव, वडाळी, चारठाणा, कवडा, मांडवी, पाडाळी या ११ लघु प्रकल्पांमध्ये सध्या केवळ १० टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. टाकळवाडी (ता. गंगाखेड) आणि दहेगांव (ता. जिंतूर) हे दोन तलाव कोरडे पडले आहेत. नखातवाडी (ता. सोनपेठ), तांदुळवाडी (ता. पालम), कोद्री (ता. गंगाखेड), जोगवाडा, बेलखेडा, चिंचोली, आडगांव, केहाळ, भोसी (ता. जिंतूर) या तलावातील उपयुक्त पाणीसाठा संपून जोत्याखाली गेला आहे.
करपरा मध्यम प्रकल्पात ३२ आणि मासोळी मध्यम प्रकल्पात ५ टक्के उपयुक्त पाणीसाठा राहिला आहे. प्रकल्पांच्या ठिकाणी अनेक गावे तसेच शहरांच्या नळ पाणीपुरवठा योजनांसाठी उद्भव विहिरी आहेत. परंतु जलाशये कोरडे पडत चालल्याने या विहिरींतील पाणी पातळी खालावली आहे. त्यामुळे गावांना पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होत नसल्याचे चित्र आहे.
जिंतूर, गंगाखेड, पालम, पूर्णा तालुक्यांतील पाणीटंचाईची तीव्रता वाढली आहे. पालम तालुक्यातील रामापूर व रामापूर तांडा याठिकाणी १, नाव्हा येथे २, चाटोरी येथे २ आणि पूर्णा तालुक्यातील पिंपळा लोखंडे येथे १ असा जिल्ह्यात सहा टॅंकरने पाणीपुरवठा केला जात आहे. येत्या पावसाळ्यापर्यंत पाणीटंचाईचे स्वरूप अधिकच गंभीर होत जाणार असून टॅंकरच्या संख्येत वाढ होणार आहे.
दरम्यान, सध्याची पाणीटंचाई स्थिती, संभाव्य पाणीटंचाईचा तालुकावार आढावा घेण्यासाठी बैठकांचे आयोजन प्रशासनातर्फे केले जात आहे. सेलू, पालम, पाथरी येथे बैठका झाल्या आहेत. मंगळवारी (ता. १३) पूर्णा आणि गुरुवारी (ता. १५) परभणी तालुका टंचाई आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.