नाशिक : जिल्ह्यातील गंगापूर धरण समूह, पालखेड धरण समूह, गिरणा खोऱ्यातील आळंदी, करंजवण, वाघाड, ओझरखेड, तिसगाव, दारणा, भावली, मुकणे, वालदेवी, कडवा, भोजापूर, हरणबारी, केळझर आणि माणिकपूंज ही १६ धरणे तुडूंब भरली आहेत. तर इतर आठ लहान-मोठ्या धरणांचा पाणीसाठाही सरासरी ९८ टक्क्यांवर पोचला आहे. मात्र पांजण नदीवर मध्यम प्रकल्प म्हणून असलेले नाग्यासाक्या धरण अवघे ३२ टक्के भरले आहे. त्यामुळे या धरणाच्या लाभक्षेत्रात पाणीटंचाईची चिंता आहे.
जिल्ह्यात यंदा पावसाळ्याच्या सुरवातीला, मध्य आणि आता अंतिम कालावधीतही पावसाने ठराविक कालावधीत टप्प्या-टप्प्याने जोरदार, संततधार हजेरी लावलेली आहे.त्यामुळे जिल्ह्यातील २४ लहान-मोठ्या आणि मध्यम धरणांची पाणीपातळी अवघे काही दिवसांतच पूर्ण वाढलेली होती. त्यात पाण्याचा अजून साठा करता येत नसल्याने धरणातून ठराविक कालावधीने आणि सुरू असलेल्या पावसाच्या रिपरिपीमुळ पाणी सोडण्याची वेळ जलसंपदा विभागावर आलेली होती.
त्यामुळे जेवढे धरणात पाणी साठलेले आहे. त्याच्या निम्म्यावर पाणी धरणातून विसर्ग करण्यात आले आहे. त्यामुळे मराठवाड्यातील जायकवाडी धरण यंदा नाशिकमधील धरणातील विसर्गामुळे ९२ टक्क्यांवर भरले आहे. त्यामुळे जायकवाडी धरणातून यंदा नऊ वर्षांनंतर विसर्ग करण्याची वेळ जलसंपदा विभागावर आली आहे.
गंगापूर धरणातून जुलैपासून विसर्ग
गंगापूर धरण समूहाच्या काश्यपी, गौतमी गोदावरी, आळंदी आणि गंगापूर धरणात जुलै महिन्यापासून पाण्याची आवक होत होती. कारण या धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरवातीलपासूनच चांगला पाऊस सुरू होता. त्यामुळे दारणा धरणानंतर नाशिक तालुक्यातून गंगापूर धरणातून विसर्ग सुरू झालेला होता. सध्या गंगापूर धरणात ९८ टक्के पाणीसाठा आहे तर, काश्यपी, गौतमी गोदावरीमध्ये ९९ आणि आळंदी धरणात १०० टक्के जलसाठा झाला आहे.
इगतपुरी तालुक्यातील सर्वात मोठे दारणा धरण यंदा भरले आहे. या धरणातून सतत दोन महिने विसर्ग करण्यात आला. त्यामुळे दारणात जेवढे पाणी साठवले आहे. त्याच्या क्षमतेच्या पातळीएवढेच पाणी धरणातून विसर्गाद्वारे वाहून गेलेले आहे. त्यामुळे अजूनही पाऊस झाला की पाटबंधारे विभागाला दारणा धरणातून विसर्ग करावा लागत आहे. सध्या दारणात १०० टक्के पाणीसाठा झालेला आहे. त्याचबरोबर भावली, वालदेवी आणि कडवा धरणातही १०० टक्के जलसाठा आहे. त्यामुळे पालखेड धरण समूहाची जलपातळी ९५ टक्यांवर पोचली आहे.
जिल्ह्यातील सर्वात मोठे धरण म्हणून ओळख असलेले गिरणा धरण यंदा ६५ टक्के भरले आहे. या धरणात गत अनेक वर्षांनंतर पाण्याची पातळी सर्वोच्च झाली आहे. १८ हजार ५०० दलघफू साठवण क्षमता या धरणाची आहे. पुनद आणि माणिकपूंज धरणातही ९८ टक्के साठा झाला आहे. त्यामुळे नांदगाव, येवला या तालुक्यांतील उन्हाळ्यातील टंचाई यंदा कमी असणार आहे.