औरंगाबाद : मराठवाड्यातील पाणीसाठ्यांना मोठी ओहोटी लागली आहे. ७४६ लघू प्रकल्पांमधील उपयुक्त पाणीसाठा १७ टक्क्यांवर आला आहे. अनेक लघू प्रकल्प कोरडे पडले आहेत. ७५ मध्यम प्रकल्पांमध्येही केवळ २८ टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असल्याचे चित्र आहे.
मराठवाड्यातील मोठ्या अकरा प्रकल्पांमध्ये मार्चअखेर ३२ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. दुसरीकडे ७५ मध्यम प्रकल्पात २८, गोदावरी नदीवरील ११ बंधाऱ्यांमध्ये ३४, तेरणा, मांजरा, रेणा नदीवरील २४ बंधाऱ्यांमध्ये केवळ १५ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.
लघू प्रकल्पांबाबत सर्वाधिक चिंताजनक स्थिती औरंगाबाद, परभणी, हिंगोली जिल्ह्यांची आहे. हिंगोली जिल्ह्यातील २७ लघू प्रकल्पात केवळ ७ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असून, परभणी जिल्ह्यातील २२ लघू प्रकल्पात ९, तर औरंगाबाद जिल्ह्यातील ९३ लघू प्रकल्पात केवळ १२ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.
जालना जिल्ह्यातींल लघू प्रकल्पांमधील पाणीसाठ्याची स्थिती फारशी समाधानकारक नाही. जालना जिल्ह्यातील ५७ लघू प्रकल्पातही १२ टक्केच उपयुक्त पाणीसाठा आहे. नांदेड जिल्ह्यातील ८८ लघू प्रकल्पात १५, बीडमधील १२६ प्रकल्पांत २१, लातूरमधील १३२ प्रकल्पांत २१, उस्मानाबादमधील २०१ लघू प्रकल्पात १५ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.
मराठवाड्यातील ७५ मध्यम प्रकल्पांमध्ये केवळ २८ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामध्ये सर्वाधिक चिंताजनक स्थिती औरंगाबाद जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांतील पाणीसाठ्याची आहे.
औरंगाबादमधील १६ मध्यम प्रकल्पांत ५ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. त्यापाठोपाठ परभणीतील २ प्रकल्पांत १४, जालन्यातील ७ प्रकल्पांत २५, नांदेडमधील ९ प्रकल्पांत ३०, लातूरमधील ८ प्रकल्पांत ३२, उस्मानाबादमधील १७ प्रकल्पांत ४२, तर बीड जिल्ह्यातील १६ मध्यम प्रकल्पात ४५ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.
मराठवाड्यातील ७५ मध्यम प्रकल्पांपैकी दहा मध्यम प्रकल्पांतील उपयुक्त पाणीसाठा संपुष्टात आला आहे. यामध्ये सर्वाधिक ९ मध्यम प्रकल्प औरंगाबाद जिल्ह्यातील असून, त्यापाठोपाठ नांदेड व बीड जिल्ह्यांतील प्रत्येकी एका प्रकल्पाचा यात समावेश आहे.