जळगाव : जिल्ह्यातील मोठ्या व मध्यम सिंचन प्रकल्पांमधील पाणीसाठा कमी होत असून, पश्चिम भागातील प्रकल्प महिनाभरात कोरडेठाक होतील, अशी स्थिती आहे. पुढील वर्षी पावसाळा झाला नाही तर स्थिती आणखी बिकट बनेल, असे शेतकरी व जाणकारांचे म्हणणे आहे.
जिल्ह्यातील प्रमुख सिंचन प्रकल्पात समाविष्ट असलेल्या गिरणा धरणातील साठा ५० टक्क्यांवर आला आहे. यंदा ७५ टक्केच पाऊस झाल्याने हतनूर, मंगरूळ (ता. रावेर) वगळता कुठलाही प्रकल्प १०० टक्के भरला नाही.
त्यातच गिरणा प्रकल्पातून दोन आवर्तने सोडली आहेत. तिसरे आवर्तन हा प्रकल्प पूर्ण न भरल्याने यंदा सोडले नाही.
हतनूर प्रकल्पामधून तिसरे आवर्तन सोडले आहे. या दोन्ही प्रकल्पांमध्ये सध्याचा साठा ५० टक्क्यांखाली आल्याची माहिती आहे. पुढील काळात गिरणासह हतनूर प्रकल्पातील साठा चिंताजनक स्थितीत येईल, असे सांगण्यात आले.
मंगरूळ धरण १०० टक्के भरले होते. जामनेर तालुक्यातील तोंडापूर, रावेरमधील अभोळा, सुकी, यावलमधील मोर हे प्रकल्प मात्र ८० टक्केच भरले होते. पश्चिम भागातील पाचोरामधील बहुळा, पारोळा व एरंडोलनजीकचे तामसवाडी, पद्मालय हे प्रकल्प भरलेच नाहीत. मन्याड (ता. चाळीसगाव) प्रकल्पात ५४ टक्के जलसाठा झाला होता. अर्थातच पारोळा, पाचोरा, एरंडोल, अमळनेर, चाळीसगाव भागातील सर्वच प्रकल्प महिनाभरात कोरडेठाक होतील, अशी स्थिती आहे.
वाघूर प्रकल्पात ६० टक्के पाणीसाठा आहे. त्यातूनही जळगाव व जामनेर शहरासह काही उद्योगांना सातत्याने पाणीपुरवठा करावा लागतो. वाघूर प्रकल्पात पुढील दोन वर्षे पिण्यासाठी पाणी मिळेल, एवढा पाणीसाठा आहे. परंतु इतर प्रकल्पांबाबत दैना होत आहे. पश्चिम भागातील प्रकल्पांमध्ये जलसाठा मुबलक नसल्याने बागायतीदेखील हवी तशी नाही. पुढे पिण्याच्या पाण्याचे संकट उभे ठाकेल, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.