कर्जमुक्ती, दीडपट हमीभावासंदर्भात संसदेत विधेयके आणणार

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई : देशातील शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमुक्ती मिळावी आणि उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव मिळावा यासाठी दोन स्वतंत्र खासगी विधेयके आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात संसदेत मांडणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी बुधवारी (ता.१७) सांगितले. ते मंत्रालयात पत्रकारांशी बोलत होते.

खासदार राजू शेट्टी म्हणाले, की गेल्या २० आणि २१ नोव्हेंबरला देशभरातील १८८ शेतकरी संघटनांनी राजधानी दिल्लीत किसान मुक्ती आंदोलन सुरू केले आहे. यात शेतकरी आत्महत्येवरही एक विशेष सत्र होते. या वेळी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबीयांनी देशाच्या सर्वोच्च सभागृहात लोकसभेत शेतकऱ्यांच्या व्यथांची दखल घेतली जात नाही अशी खंत व्यक्त केली.

त्यानंतर शेतकऱ्याशी संबंधित दोन विधेयके आम्ही किसान मुक्ती आंदोलनात सादर केली. देशातील शेतकऱ्याला संपूर्ण कर्जमुक्ती देण्याचा अधिकार २०१७ आणि उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभाव देण्याचा अधिकार अशी दोन विधेयके सादर केली. या विधेयकांचा मसुदा देशभर घेऊन जावे. शेती क्षेत्रातील तज्ज्ञांशी चर्चा करून, वेबसाइटद्वारे या मसुद्यावर सूचना मागवून त्यातून अंतिम मसुदा तयार करावा, असे ठरले.

श्री. शेट्टी पुढे म्हणाले, त्यासाठी किसान मुक्ती संसदेने दोन समित्याही स्थापन केल्या आहेत. त्यानंतर सर्वंकष असा हा मसुदा लोकसभेत आणि राज्यसभेत सादर करावा, असा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात ही विधेयके आम्ही लोकसभा आणि राज्यसभेत मांडणार आहोत. त्याआधी नवी दिल्लीत पुन्हा एक चर्चासत्र ठेवले जाणार आहे. त्याला सगळ्याच राजकीय पक्षांना निमंत्रण करण्यात येणार आहे.

तसेच येत्या १९ जानेवारीला मुंबईत याअनुषंगाने एक दिवशीय चर्चासत्र ठेवण्यात आले आहे. त्याला उच्च न्यायालयातील वकिलांना चर्चेसाठी निमंत्रित केले आहे. प्रत्येक राज्याच्या राजधानीच्या ठिकाणी अशी चर्चा घडवून आणत आहोत, असेही शेट्टी यांनी स्पष्ट केले.  

भाजपला बहुमत घटना बदलण्यासाठी नाही प्रजासत्ताकदिनी २६ जानेवारीला मुंबईत होत असलेल्या संविधान बचाव आंदोलनाबाबत खासदार राजू शेट्टी म्हणाले, गेट वे ऑफ इंडियाच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ दोन तास मूक धरणे आंदोलन केले जाणार आहे. देशात सध्या जे वातावरण निर्माण झाले आहे, सर्वसामान्य नागरिकांचा कायदा आणि घटनेवरील विश्वासाला तडे जात आहेत. सर्वोच्च न्यायालयातील चार न्यायमूर्तींनी आम्हाला न्याय मिळायला हवा, अशी भावना व्यक्त केली. घटना वाचविण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहनही श्री. शेट्टी यांनी केले. दरम्यान, त्याआधी या आंदोलनाच्या तयारीसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्यासोबतही राजू शेट्टी यांनी चर्चा केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com