जाहीर ऊसदर कमी करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करावी

जाहीर ऊसदर कमी करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करावी

सातारा : ज्या साखर कारखान्यांनी ऊस गाळप केल्यापासून १५ दिवसांत पहिला हप्ता दिलेला नाही, त्या कारखान्यांनी व्याजासह द्यावा आणि जाहीर केलेला दर कमी करणाऱ्या कारखान्यांवर कारवाई करावी, अन्यथा मंत्रालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा बळिराजा शेतकरी संघटनेच्या वतीने जिल्हाध्यक्ष साजीद मुल्ला व पदाधिकाऱ्यांनी सोमवारी (ता. १२) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदनाद्वारे दिला.

मुख्यमंत्री इस्लामपूर येथील कार्यक्रमासाठी येथील विमानतळावरून रवाना झाले. तत्पूर्वी बळिराजा शेतकरी संघटनेच्या वतीने मुल्ला, बळिराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला, माजी जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव, सागर कांबळे, विक्रम थोरात, उत्तमराव खबाले यांच्यासह बळिराजाच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले. या वेळी ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह पृथ्वीराज देशमुख, विठ्ठल रुक्‍मिणी देवस्थानचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले, मुकुंद चरेगावकर आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील काही कारखाने सुरू होऊनही नियमाप्रमाणे ऊस गाळप केल्यानंतर १५ दिवसांमध्ये शेतकऱ्यांना पहिले बिल दिलेले नाही. त्यामुळे संबंधित कारखान्यांनी व्याजासह पहिला हप्ता शेतकऱ्यांना द्यावा, त्याचबरोबर साखरेचे दर पडल्याचे कारण सांगून दर कमी करण्याचा प्रयत्न कारखानदारांकडून होत आहे.

त्यामुळे अशा कारखान्यांचे गाळप परवाने रद्द करण्यात यावेत, अशी मागणी बळिराजा शेतकरी संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. त्याचबरोबर कारखानदारांनी व्याजासह ऊसबिल द्यावे, अशी मागणी करत प्रसंगी मुंबईत मंत्रालयासमोर तीव्र आंदोलन करू, असा इशाराही निवेदनाद्वारे दिला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com