सांगली : जिल्ह्यातील द्राक्ष हंगाम संपला आहे. द्राक्ष उत्पादक शेतकरी एप्रिल छाटणी करण्यासाठी पुढाकार घेत आहेत. मात्र दुष्काळी भागातील खानापूर, तासगाव, आणि कवठेमहांकाळ तालुक्यांत पाणीटंचाईमुळे एप्रिल छाटण्या रखडल्या आहेत.
जिल्ह्यात द्राक्षाचे क्षेत्र सुमारे एक लाख एकर आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांत द्राक्षाच्या क्षेत्रात सुमारे १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या वर्षापेक्षा यंदाच्या द्राक्ष हंगामात शेतकऱ्यांनी नैसर्गिक आपत्तीवर मात करून दर्जेदार द्राक्ष उत्पादन घेतले. द्राक्ष आणि बेदाण्याला चांगले दर राहिल्याने शेतकरी समाधानी आहेत.
द्राक्ष उत्पादक शेतकरी खरड छाटणीचे नियोजन करू लागले आहेत. वाळवा, पलूस तालुक्यात पाणी उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांनी द्राक्षाच्या एप्रिल छाटण्या पूर्ण केल्या आहेत. मात्र तासगाव, कवठेमहांकाळ, खानापूर तालुक्यांसह मिरज तालुक्याच्या पूर्व भागात पाण्याची कमतरता भासते आहे. जरी ताकारी, टेंभू आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजना सुरू असल्या, तरी वेळेत पाणी मिळत नाही. याचा परिमाण एप्रिल छाटणीवर दिसतो आहे.
गेल्या वर्षी पुरेसा पाऊस होऊनही यंदा विहिरी, कूपनलिकांमध्ये अत्यल्प पाणीसाठा आहे. कमी पाणी असले तरीही उशिरात उशिरा १५ एप्रिलपर्यंत छाटण्या घेण्याशिवाय शेतकऱ्यांसमोर दुसरा पर्यायच नाही. द्राक्ष गेल्यानंतर विश्रांतीचा काळ संपला आहे. यामुळे कमी पाणी असले तरी छाटण्या घ्याव्याच लागल्या. याचा परिणाम द्राक्ष पिकावर नक्कीच होण्याची शक्यता आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.