तुरीचे चुकारे रखडल्याने शेतकरी अडचणीत   

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

संग्रामपूर, जि. बुलडाणा  : शासनाच्या हमीभाव खरेदी केंद्रावर विक्री केलेल्या तुरीचे पैसे दीड महिन्यांपेक्षा अधिक काळापासून मिळाले नसल्याने शेतकऱ्यांसमोर असंख्य अडचणी उभ्या राहिल्या आहेत. तूर खरेदी केलेल्या केंद्रांवरील प्रक्रिया पूर्ण झालेली असताना जिल्हा मार्केटिंग फेडरेशनकडून पैसे देण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याचे समजते. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक व्यवहार विस्कळित झाले आहेत. 

सध्या ग्रामीण भागात लग्नसराईचा हंगाम जोरात सुरू आहे. तसेच शेतीच्या पेरणीपूर्व मशागतसाठी पैशांची गरज असल्याने माल विकूनही शेतकऱ्यांना पैसे मिळत नाहीत. शासनाने येथे हमीभावाने १३ मार्चपासून तूर खरेदी सुरू केली. या वेळी पेमेंट तातडीने होणार या आशेने बाजारात शेतकऱ्यांनी तूर विक्री केली नाही. या केंद्रावर २१ एप्रिलपर्यंत १५४३ शेतकऱ्यांकडून १०, ७४९.७० क्विंटल तुरीची खरेदी झालेली आहे. केंद्र सुरू होऊन दीड महिन्याचा कालावधी होत आहे. तरी पण शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्यात आलेले नाहीत. राजकीय सर्व नेते लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत व्यस्त असल्याने शेतकऱ्यांच्या या समस्येकडे कुणाचेही लक्ष नाही.  

खरेदी केंद्राचा आर्थिक व्यवहार उसनवारीवर?  शासनाकडून येथील खरेदी विक्री संस्थेला हमीभाव खरेदीसाठी मान्यता आहे. या ठिकाणी केंद्र चालवीत असताना दररोज १५ ते २० हजार खर्चांसाठी पैशांची गरज असते. यासाठी जिल्हा मार्केटिंग कार्यालयाकडून पैसे दिले जातात. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून पैसे अडकून असल्याने सद्यःस्थितीत संस्थेला उसनवारी करून व्यवहार करावे लागत आहे. यामध्ये शिलाई मशीन, रोजनदारी, स्टेशनरी व इतर खर्चांचा समावेश असतो. शेतकऱ्यांसोबत शेतकऱ्यांची संस्थाही आर्थिक विवंचनेत असल्याचे यातून दिसते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com