सातारा ः साखरेच्या दरात घसरण झाल्यामुळे जिल्ह्यातील अनेक कारखान्यांनी जाहीर केलेल्या ऊसदरात १५० ते २५० रुपयांनी कपात केली होती. बाजारपेठेत सध्या साखरेच्या दरात सुधारणा झाली आहे. सध्या साखरेस क्विंटलला ३१०० ते ३२०० दर मिळत आहे. यामुळे कारखान्यांकडून ऊसदरात करण्यात येत असलेली कपात रद्द करून पूर्ववत ऊसदर देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
सातारा जिल्ह्यात नऊ सहकारी व सहा खासगी कारखान्यांचा गाळप हंगाम सुरळीत सुरू आहे. या हंगामाच्या सुरवातीस पहिल्या हप्त्याबाबत वाद होऊ नये, यासाठी प्रशासनाने शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी व साखर कारखान्यांचे प्रतिनिधी यांच्यात बैठक घेऊन ऊसदराबाबत तोडगा काढला होता. कोल्हापूर पॅटर्नप्रमाणे एफआरपी अधिक २०० रुपये या प्रमाणे दर देण्याचे ठरले होते. हा तोडगा बैठकीस असलेल्या सर्व कारखान्यांच्या प्रतिनिधींनी मान्य केला होता.
त्यानुसार पहिल्या पंधरवड्यात गाळप झालेल्या उसाचे पैसेही अदा करण्यात आले होते; मात्र मागील महिनाभरात साखरेच्या दरात घसरण होऊन ते २९०० रुपयांच्या दरम्यान आले होते. यामुळे जिल्ह्यातील अनेक कारखान्यांनी पहिल्या उचलीमध्ये २०० ते ३०० रुपयांची कपात केली होती. काही कारखान्यांनी सर्व बिले थांबविण्याचा प्रकार सुरू केला होता.
साखरेच्या दरातील घसरणीमुळे साखर हंगाम अडचणीत आल्याने केंद्र सरकारने आयात शुल्क वाढविण्याचा निर्णय घेतला होता. यामुळे साखरेचे घसरलेल्या दरात वाढ होऊन क्विंटलला ३१०० ते ३२०० रुपये दर मिळू लागला आहे. सध्या साखरेस मिळत असलेल्या दराप्रमाणे बॅंकाकडून उचल मिळत आहे. यामुळे जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी पूर्वी जाहीर केलेल्या हप्त्याप्रमाणे सध्या जात असलेल्या उसाला दर द्यावा, अशी मागणी शेतकरी करू लागले आहेत. जिल्ह्यात मंगळवारपर्यंत (ता. २०) ६२ लाख २९ हजार ८१६ टन ऊस गाळपाद्वारे ७२ लाख २८ हजार ५१५ क्विंटल साखर उत्पादन झाले आहे.