नाशिक : कांद्याचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिक जिल्ह्यामध्ये कांदादरात गेल्या आठवड्यापासून सातत्याने घसरण होत आहे. गेल्या महिन्यात चार हजारांची पातळी गाठणाऱ्या कांद्याला सद्यःस्थितीत कमाल दोन हजार रुपयांचा दर मिळत आहे. कांदा दरात आणखी घसरण झाली, तर शेतकरी संकटात सापडण्याची शक्यता आहे. यामुळे दरवाढीसाठी किमान निर्यातमूल्य पूर्णपणे हटविण्याची मागणी होऊ लागली आहे.
महाराष्ट्रासह इतर राज्यांत कांद्याची वाढलेली आवक आणि निर्यातमूल्य डॉलरमध्ये असलेली वाढ यामुळे सोमवारच्या तुलनेत कांदा दरात ३०० रुपयांची, तर मागील आठवड्याच्या तुलनेत १२०० रुपयांची घसरण झाली. यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये दररोज दोन लाख ते अडीच लाख क्विंटलची आवक होत आहे. पुणे, गुजरात, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक राज्यांतून कांद्याची मोठी आवक होत आहे. त्यामुळे नाशिकमधून मागणी कमी झाल्याने ही घसरण होत आहे. गेल्या महिन्यात सरकारने दीडशे डॉलरने निर्यातामूल्य कमी करून ७०० डॉलरवर आणले असले, तरी त्याचा निर्यातीला फारसा लाभ झालेला नाही. यामुळे निर्यातमूल्यात आणखी घट करण्याची मागणी होऊ लागली आहे.