असंतोष विभागण्यासाठीच कर्जमाफीचे वेगवेगळे टप्पे

असंतोष विभागण्यासाठीच कर्जमाफीचे वेगवेगळे टप्पे
असंतोष विभागण्यासाठीच कर्जमाफीचे वेगवेगळे टप्पे

मुंबई : सरकारने कर्जमाफीसाठी ज्या अटी- शर्ती लागू केल्या, त्यामुळे लाखो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत. लाखो शेतकऱ्यांचा हा असंतोष एकदम भडकू नये यासाठीच सरकारने कर्जमाफीच्या प्रक्रियेचे असे टप्पे केले आहेत. शेतकऱ्यांमध्ये फूट पाडून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचा आरोप शेतकरी संघटनांच्या सुकाणू समितीचे समन्वयक डॉ. अजित नवले यांनी केला आहे.

नवले म्हणाले, की राज्य सरकारने आज काही शेतकऱ्यांच्या खात्यांत कर्जमाफीची रक्कम वर्ग करून शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यास सुरवात केली आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळण्यास सुरवात झाली या घटनेचे सुकाणू समिती स्वागत करत आहे. संपन्न झालेल्या या कार्यक्रमात राज्याच्या संपूर्ण कर्जमाफीचे स्वरूप स्पष्ट होईल, अशी आशा राज्यभरातील लाखो शेतकरी बाळगून होते.

प्रत्यक्षात मात्र एकूण किती लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ होईल व एकूण किती हजार कोटींचे कर्ज माफ केले जाईल, याबाबत कोणतीही स्पष्ट आकडेवारी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली नाही. उलट एकदाच अशी संपूर्ण आकडेवारी जाहीर न करता कर्जमाफीचे अनेक टप्पे करीत तुकड्यातुकड्याने आकडेवारी जाहीर करण्याचे धोरण राज्य सरकारने स्वीकारल्याचे स्पष्ट झाले आहे.

तुकड्यातुकड्याने चित्र स्पष्ट करण्याच्या रणनीतीचा भाग म्हणून आज पहिल्या टप्यात ८९ लाख बँक खातेदार शेतकऱ्यांपैकी केवळ ८.५ लाख शेतकऱ्यांनाच कर्जमाफी देण्यात आली आहे. प्राप्त माहितीची छाननी झाल्यावर टप्प्याटप्प्याने पुढील घोषणा करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सरकारने कर्जमाफीसाठी ज्या अटी- शर्ती लागू केल्या, त्यामुळे लाखो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत. लाखो शेतकऱ्यांचा हा असंतोष एकदम भडकू नये यासाठीच सरकारने कर्जमाफीच्या प्रक्रियेचे असे टप्पे केले आहेत. शेतकऱ्यांमध्ये फूट पाडून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न सरकार करत आहे.

प्रमाणपत्र वाटपाच्या कार्यक्रमात जी अत्यल्प आकडेवारी सरकारने समोर ठेवली, त्यातही पुन्हा नवी विसंगती समोर आली आहे. अनेक अटी लागू असल्याने अर्ज केलेल्या ५५ लाख शेतकऱ्यांपैकी अत्यल्प शेतकरीच कर्जमाफीसाठी पात्र ठरणार आहेत. सरकारला याची पुरेपूर कल्पना आल्यानेच अपात्र ठरलेल्या लाखो शेतकऱ्यांचा असंतोष एकदम भडकू नये यासाठी सरकारने कर्जमाफीचे अनेक छोटे छोटे टप्पे करत शेतकऱ्यांची एकजूट होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सरकारच्या या फुटपाड्या रणनीतीचा सुकाणू समिती तीव्र शब्दांत धिक्कार करत आहे.

राज्यातील एकूण किती शेतकऱ्यांना, एकूण किती रकमेची कर्जमाफी करणार हे जाहीर करा, सर्व शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा, शेतीमालाला रास्त भावाची हमी द्या व स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करा या मागण्यांचा सुकाणू समिती पुनरुच्चार करत आहे. समिती २० ऑक्टोबर रोजी बलिप्रतिपदेच्या दिवशी आपल्या या मागण्यांसाठी बळिराजाच्या मिरवणुका काढणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com