कार्यक्षम पाणी वापरासाठी धोरण हवे : डाॅ. बी. व्यंकटेश्वरलू

कुलगुरू डाॅ. बी. व्यंकटेश्वरलू
कुलगुरू डाॅ. बी. व्यंकटेश्वरलू

परभणी : सिंचनासाठी वापरात येणाऱ्या पाण्याची उत्पादकता अत्यंत कमी आहे. औद्योगिक वापरासाठी पाण्याचा वापर वाढत आहे. त्यामुळे येत्या काळात शेतीसाठी पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध होईल की नाही याची शाश्वती राहिली नाही. त्याअनुषंगाने धोरणे निश्चित करून कार्यक्षम पाणी वापरासाठीची त्यांची अमंलबजावणी करावी लागणार आहे, असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. बी. व्यंकटेश्वरलू यांनी शनिवारी (ता. ३०) केले. येथील ज्ञानोपासक महाविद्यालयामध्ये ‘दुर्मिळ पाण्याचे आदर्श व्यवस्थापन’ या विषयावर आयोजित १८ व्या महाराष्ट्र सिंचन परिषदेचे उद्‍घाटन झाले. यावेळी डाॅ. बी. व्यंकटेश्वरलू अध्यक्षस्थानी होते. अकोला येथील डाॅ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. व्ही. एम. भाले, महाराष्ट्र सिंचन सहयोगचे अध्यक्ष डाॅ. दि. मा. मोरे, माजी कुलगुरू डाॅ. व्यंकट मायंदे, परिषदेचे स्वागताध्यक्ष माजी खासदार गणेशराव दुधगावकर, परभणी सिंचन सहयोगच्या अध्यक्षा डाॅ. संध्याताई दूधगावकर, प्रा. बापू अडकिने आदी उपस्थित होते. यावेळी डाॅ. व्यंकटेश्वरलू म्हणाले, की शेतीमध्ये सिंचनासाठी वापरात येणाऱ्या पाण्याची उत्पादकता कमी असल्यामुळे अनेक देशांत जास्त पाण्याची गरज असलेल्या पिकांचे उत्पादन घेतले जात नाही. त्यांची आयात केली जाते. तापमानात एक अंशाने वाढ झाली तर पाण्याची गरज दहा टक्क्यांनी वाढते. योग्य व्यवस्थापन न केल्यास शेतीसाठी पाणी कमी पडू शकते. त्यामुळे येत्या काळात सर्वांनाच जागरूक होऊन समजदारीने पाणी वापर करावा लागणार आहे. डाॅ. भाले म्हणाले, की पाऊस कमी झालेला नाही. पावसाच्या आगमनाच्या वेळेत बदल झाला आहे. त्यामुळे पडणाऱ्या पाण्याचे संवर्धन केल्यास मराठावाडा, विदर्भातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी एक संरक्षित पाणी उपलब्ध होऊ शकते. सिंचन क्षेत्रात वाढ करण्यासाठी कालव्या ऐवजी बंदिस्त सिंचन प्रणालीचा अंगीकार करावा लागणार आहे. शेतकऱ्यांच्या गरजेनुसार आवश्यक संशोधनावर कृषी विद्यापीठांना भर द्यावा लागणार आहे.  डाॅ. मोरे म्हणाले, की निसर्ग कोपलेला, अवर्षण प्रवण भाग असलेल्या मराठवाड्यातील शेतकऱ्यांना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत केवळ आठ महिने सिंचनासाठी पाणी उपलब्ध होते.  यावेळी प्रा. बापू अडकिने, प्रा. हरिश्चंद्र शिंदे यांनी संपादित केलेल्या स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. कवी प्रा. इंद्रजित भालेराव यांनी सूत्रसंचालन केले, तर डाॅ. संध्याताई दूधगावकर यांनी आभार मानले. विशेष कामगिरीबद्दल गौरव ‘अॅग्रोवन’चे सहसंपादक विजय सुकळकर, स्वच्छतादूत माधवराव पाटील शेळगावकर, स्वातंत्र्य सैनिक वसंतराव अंभुरे, पत्रकार उत्तमराव दगडू, मृदाशास्त्रज्ञ डाॅ. एस. बी. वराडे, प्रशांत आडे, कमलकांत वडेलकर यांचा सन्मानपत्र देऊन विशेष सत्कार करण्यात आला. सिंचन मित्र पुरस्कार- चंद्रकांत कुलकर्णी (रा. डोंगरकडा, जि. हिंगोली). प्रयोगगशील शेतकरी पुरस्कार, रामेश्वर मांडगे (रा. बेलवाडी, जि. हिंगोली). विद्याताई पवार- उत्कृष्ट महिला शेतकरी पुरस्कार, द्रौपदी जाधव (जिंतूर), ताराबाई केशवराव वसेकर (रा. खानापूर, जि. परभणी). ल. स. कोकीळ सिंचन पुरस्कार, रुस्तुमराव देशमुख (रा. इरळद,  जि. परभणी). विमलताई बेलसरे सिंचन पुरस्कार, प्रताप काळे (धानोरा काळे, जि. परभणी), राजेंद्र गाडेकर (पेण टाकळी). ल. स. कोकीळ सिंचन लेखन पुरस्कार डाॅ. नितिन मार्कंडेय, प्रा. मधुकर मोरे, डाॅ. स्मिता खोडके. उद्योजकता पुरस्कार मुरलीधर डाके, पुरुषोत्तम खुराणा, श्री. पेडगावकर, मो. युसूफ इनामदार. ब्रह्मदेव सरडे, सुभाष अडकिने, प्रवीण पाटील, जनार्दन शिंदे, बाळासाहेब शिंदे, संजय मोरे यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com