अकोला ः आजची शेती वातावरणातील अनपेक्षित बदल, कीड रोगांचे वाढते प्रमाण, अनिश्चित व अवेळी होणारा पाऊस, परिणामी वाढता उत्पादन खर्च व त्या प्रमाणात प्राप्त न होणारा बाजारभाव यासह विविध कारणांनी अस्थिर झाली आहे. वैदर्भीय शेतीला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी शेती आणि शेतकरी हितासाठी कार्यरत सर्वच विभागांना एकत्रित येत संयुक्त प्रयत्न आणि उपाययोजना करण्याची गरज आहे, असे मत डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी व्यक्त केले.
पश्चिम विदर्भ विभागाच्या विभागीय संशोधन व विस्तार सल्लागार समितीच्या ६२ व्या रब्बी हंगाम नियोजनासाठी विद्यापीठात आयोजित सभेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.
या प्रसंगी विद्यापीठाचे संशोधन व विस्तार शिक्षण संचालक डॉ. डी. एम. मानकर, विभागीय सहसंचालक अमरावती कार्यालयाचे व्ही. व्ही. चवाळे, सहयोगी संशोधन संचालक डॉ. आदिनाथ पसलावार अादी उपस्थित होते.
डाॅ. भाले पुढे म्हणाले, की कृषी विद्यापीठ, कृषी विभाग, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय विकास विभाग, मत्स्यव्यवसाय विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, यासह विविध समकक्ष विभाग, सेवाभावी संस्था, खासगी संस्था, महामंडळे आदींनी ग्रामविकासाचे आपले कामे एकात्मिक पद्धतीने व संयुक्त विचाराने केल्यास खऱ्या अर्थाने ग्रामीण भागाचा व पर्यायाने विदर्भाचा विकास होईल. शेती आणि शेतकरी विकासाच्या कोणत्याही उपक्रमात हे विद्यापीठ अग्रेसर राहील.
विद्यापीठ शास्त्रज्ञानासुद्धा वास्तववादी तथा कालसुसंगत संशोधन करण्यासाठी प्रयत्नरत राहण्याचे आवाहन केले.
यवतमाळसह इतर ठिकाणी फवारणी दरम्यान झालेल्या विषबाधांचा उल्लेख करताना एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन तंत्राचा अल्प खर्चाचा व शाश्वत पर्याय उपलब्ध असताना महागडी अतिविषारी कीटकनाशके फवारल्याने पिकाचा उत्पादन खर्च तर वाढतोच. शिवाय जिवाची व जमिनीची हानी होत प्रदूषणसुद्धा होते, असे ते म्हणाले.
श्री. चव्हाळे यांनी, शासनाच्या कृषी विभागाद्वारा रब्बी हंगामात क्षेत्र विस्ताराचे नियोजन असल्याचे सांगितले. सभेचे सूत्रसंचालन करून डॉ. जे. पी. देशमुख यांनी आभार मानले.