नगर : शेती अभ्यासाकरिता परदेश दौऱ्यासाठी कृषी विभागाकडे अर्ज केलेल्या आणि त्यात पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांची निवड यादी मंगळवारी (ता. १७) निश्चित केली जाणार आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनमध्ये जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सोडत काढण्यात येणार आहे.
कृषी विभागाच्या मदतीने इस्राईल व अन्य देशांतील सुधारित शेतीचा अभ्यास करण्याची संधी राज्यातील शेतकऱ्यांना मिळावी, यासाठी राज्याच्या कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना परदेशात जाण्याची संधी दिली जाते. त्यासाठी कृषी विभागातर्फे ५० टक्के अनुदान दिले जाते. त्यासाठी जिल्हाभरातील सुमारे २९९ शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे अर्ज केले होते. त्या अर्जांची छाननी केली असता विविध कारणांमुळे ३९ शेतकरी अपात्र ठरले, तर ३३ शेतकऱ्यांच्या अर्जात त्रुटी आढळल्या. त्रुटी पूर्ण करण्यासाठी मुदत दिली.
दोन दिवसांत त्रुटी पूर्ण करून घेतल्या जातील. जिल्ह्यामधील सर्व शेतकऱ्यांची सोडत काढून एकत्र पात्रता यादी निश्चित केली जाणार आहे. त्यानंतर ती यादी कृषी सहसंचालकांकडे पाठवली जाणार आहे. त्यासाठी मंगळवारी (ता. १७) जिल्हाधिकारी अभय महाजन व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे यांच्या उपस्थितीत नियोजन भवनात सकाळी दहा वाजता सोडत काढली जाणार आहे. या वेळी शेतकऱ्यांनी उपस्थित राहावे, असे आवाहन तंत्र अधिकारी अशोक संसारे यांनी केले आहे.