भंडारा जिल्ह्यातील ५४४ गावांमध्ये दुष्काळ घोषित

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

भंडारा : नजरअंदाज व सुधारित पैसेवारीच्या घोषणेनंतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नजरा खरिपाच्या अंतिम पैसेवारीकडे होत्या. मात्र जिल्ह्याची अंतिम खरीप पैसेवारी ४८ जारी करण्यात आली. यात भंडारा व पवनी वगळता पाच तालुक्‍यांची पैसेवारी ५० पैशांच्या खाली असल्याने या पाच तालुक्‍यांना दुष्काळी निकषानुसार मदत मिळणार असली, तरी भंडारा व पवनी तालुक्‍यांतील शेतकऱ्यांना मात्र यापासून वंचित राहावे लागणार आहे.

धान्याचे कोठार समजल्या जाणाऱ्या भंडारा जिल्ह्यात या वर्षी धानावर किडींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला. त्यासोबतच पाऊसमान कमी झाल्याचा फटकाही शेतकऱ्यांना बसला. जिल्हा प्रशासनाने एक महिन्यांपूर्वी खरीप पिकांची नजरअंदाज हंगामी पैसेवारी ६९ पैसे घोषित केली.

खरीप हंगामाच्या सुरवातीपासून दुष्काळसदृय परिस्थिती असताना नजरअंदाज पैसेवारीच्या हंगामी आकडेवारीनंतर जिल्ह्यातील एकूण लागवड क्षेत्रापैकी असलेले पडीक क्षेत्र, कमी पर्जन्यमान, परतीच्या पावसात वादळी वाऱ्याने केलेले नुकसान याचा समावेश करीत सुधारित आणेवारी जाहीर होईल, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती.

परंतु जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांच्या अपेक्षांवर पाणी फेरले. सुधारित आणेवारीच्या घोषणेनंतर ३१ डिसेंबरला खरीप पिकांची अंतिम आणेवारी घोषित करण्यात आली. जिल्ह्यात खरिपाची ८८४ गावे व रब्बी पिकांची १४ गावे, असे एकूण ८९८ गावे आहेत. त्यापैकी ८४३ खरीप गावांची अंतिम पैसेवारी जाहीर करण्यात आली. १४ रब्बी गावांची पैसेवारी रब्बी हंगामात स्वतंत्रपणे जाहीर करण्यात येणार आहे.

८४३ पैकी ५४४ गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे, तर २९९ गावांची ५० पैशांच्यावर आहे. यात भंडारा तालुक्‍यात एक तर पवनी तालुक्‍यात सात गावांची पैसेवारी कमी असलेल्यांमध्ये समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com