सोलापुरात केंद्रीय पथकाकडून दुष्काळाची धावती पाहणी

सोलापुरात केंद्रीय पथकाकडून दुष्काळाची धावती पाहणी
सोलापुरात केंद्रीय पथकाकडून दुष्काळाची धावती पाहणी

सोलापूर : दुष्काळ पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय पथकाने मंगळवेढा तालुक्‍यातील आंधळगाव आणि सांगोला तालुक्‍यातील राजापूर गावांना गुरुवारी (ता.  ६) सकाळी भेट देऊन दुष्काळी परिस्थितीची माहिती घेतली. हा दौरा फक्त रडणाऱ्यांचे डोळे पुसणारा ठरला. व्यस्त आणि घाईचा असा हा दौरा झाला. कुठे रस्त्यात थांबून, बांधावरुन संवाद साधून पथक सांगलीकडे मार्गस्थ झाले.  

केंद्रीय पथकामधील एफसीआयचे सहसंचालक सुभाषचंद्र मीना, उपसंचालक एम. जी. टेंभुणे, चारा विशेषज्ञ विजय ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. या वेळी पुणे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भारुड,  कृषी सहसंचालक दिलीप झेंडे, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, प्रांतधिकारी प्रमोद गायकवाड, उपजिल्हाधिकारी किशोर पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज बिराजदार, कृषी उपसंचालक रवींद्र माने आदी उपस्थित होते.

आंधळगाव येथील शेतकरी सीताराम वेळापुरे यांच्या शेतीची पाहणी करून पथकाने उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला. खरीप हंगामातील पेरणी, आलेले उत्पादन, झालेला खर्च, जनावरांसाठी चारा आदीची माहिती त्यांनी घेतली. त्यानंतर सांगोला तालुक्‍यातील राजापूर येथील शेतकरी मधुकर तोडकरे यांच्या शेतीची आणि यशवंत पुजारी यांच्या विहिरीची पाहणी करण्यात आली. विहिरीत टॅंकरने पाणी सोडत असल्याचे पुजारी यांनी सांगितले.

राजापूर येथे शेतकऱ्यांकडून दुष्काळाबाबत माहिती जाणून घेतली. आमदार गणपतराव देशमुख यांनी सांगोला तालुक्‍यातील दुष्काळी परिस्थितीबाबत पथकातील अधिकाऱ्यांना माहिती दिली. एकूणच ठरलेली माहिती, ठरलेले प्रश्‍न विचारत शेतकऱ्यांना आश्‍वस्त करून पथकाने सांगलीकडे कूच केले.

‘त्वरित चारा, फळबागा वाचवा, कोरडवाहू गावांचा दर्जा द्या` खरीप पिके जळून गेली. पावसाअभावी रब्बी पेरणीही करता आली नाही. चाऱ्या अभावी जनावरे कत्तलखान्याकडे चालली आहेत. त्यांना वाचविण्यासाठी त्वरीत चारा द्या, लाखो रुपये खर्चून उभारलेल्या फळबागा जळून जात आहेत. त्या वाचविण्यासाठी मदत करा, कायम दुष्काळी गावांना कोरडवाहू गावांचा दर्जा द्या, आदी मागण्या केंद्रीय पथकाकडे आंधळगांव (ता. मंगळवेढा) येथील शेतकऱ्यांनी केल्या. पावसावर अवलंबून असणाऱ्या गावात दुष्काळाची तीव्रता जास्त आहे. या ठिकाणी दुष्काळी उपाययोजना लागू कराव्यात. कायम दुष्काळी गावांना कोरडवाहू गावांचा दर्जा देऊन शेतकऱ्यांना ठिबक सिंचनाचा लाभ द्यावा, मागेल त्याला सामूहिक शेततळे द्यावे, फळबागा वाचविण्यासाठी टॅंकरणे पाणी घालणे, सेंद्रिय मल्चिंग करणे, फळझाडावर शेडनेट टाकण्यासाठी अनुदान द्यावे, अशी मागणी दुष्काळी कोरडवाहू गाव संघर्ष समितीचे निमंत्रक अंकुश पडवळे यांनी केली. प्रदीप खांडेकर, शेतकरी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com