सांगली ः जिल्ह्यातील २८५ गावांमध्ये शासनाने दुष्काळ सदृश्य स्थिती जाहीर केली आहे. गेल्या खरीप हंगामात ५० पैसे पेक्षा कमी आणेवारी असलेल्या या गावांना टंचाईतील सवलतींचा लाभ मिळणार आहे. त्यामध्ये मिरजमधील ३९, कवठे महांकाळमधील ६०, तासगावमधील ६९, जतमधील ५० तर खानापूरमधील ६७ गावांचा समावेश आहे.
गेल्यावर्षी पावसाळा वेळेवर सुरू झाला. शेतकऱ्यांनी मशागती केल्या. काही भागांतील शेतकऱ्यांनी खरीप पेरण्याही केल्या. मात्र, त्यानंतर पावसाने ओढ दिली. त्यामुळे अनेक भागांतील पेरण्या वाया गेल्या. शेतकऱ्यांनी दुबार पेरण्या केल्या. त्यानंतर शेवटच्या टप्प्यात जिल्ह्यातील अनेक भागांत समाधानकारक पाऊस झाला. मात्र त्या पावसाचा पिकांना काहीच उपयोग झाला नाही.
शासनाने नोव्हेंबरमध्ये पाहणी करून पीक पाहणी अहवाल शासनाकडे पाठविला होता. त्यात खरीप हंगामात जिल्ह्यातील २८५ गावांत ५० पैशांपेक्षा कमी आणेवारी असल्याचे नोंदविण्यात आले होते. आटपाडी तालुक्यात गेल्यावर्षी खरीप हंगामात सुरवातीच्या काळात चांगला पाऊस झाला. त्यानंतर पावसाने ओढ दिली. त्यामुळे तालुक्यातील अनेक भागातील खरीप पिके वाया गेली आहे. मात्र, शासनाच्या नियमानुसार ही गावे दुष्काळ सदृश्य नसल्याने या तालुक्यातील एकाही गावाचा यात समावेश नाही.