ज्वारीची पेरणी वेगात
ज्वारीची पेरणी वेगात

नगर जिल्ह्यात दुष्काळी स्थिती; तरीही आशावाद कायम

पावसाच्या भरवशावर ज्वारीची पेरणी केली. पण अजून पाऊस झालेला नाही. आता उगवणीची चिंता लागलीय. शेतकरी बिकट अवस्थेतून जात आहे. पाऊस आला नाही तर परिस्थिती गंभीर होईल. - शिवराज कापरे, शेतकरी, सामनगाव, ता. शेवगाव.

नगर    : जिल्ह्यातील बहुतांश भागात गेल्या दीड महिन्यापासून पावसाचा एक थेंबही पडला नाही. आशा असलेला सारा गणेशोत्सवही कोरडा गेला. आता पावसाचा परतीचा प्रवास सुरू झालेला असताना तो अजून कुठेच बरसलेला नाही. सध्याचे चित्र पाहिले कुठेही पावसाचा मागमुस नाही, तरीही शेतकऱ्यांनी आशावाद सोडला नाही. पाऊस नक्की बरसेल या आशेने जिल्ह्याच्या काही भागात ज्वारीची पेरणी केली जात आहे.

नगर जिल्ह्यामध्ये यंदा जवळपास सर्वच भागात पाऊस नाही. केवळ अकोल्याचा पश्‍चिम भागातील पावसावर भंडारदरा, निळवंडे धरण भरले, मुळा धरणातही काही प्रमाणात पाणी जमा झाले असले तरी अकोल्याच्या काही भागात पाऊस नाही. अजूनही अकोल्यातील काही धरणे कोरडी आहेत. अकोल्यातच दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत असल्याने जिल्ह्यामधील अन्य तालुक्‍यांच्या स्थितीचा अंदाज येतो.

नेवासा, शेवगाव, पाथर्डी, जामखेड, कर्जत, पारनेर, श्रीगोंदा, श्रीरामपूर, संगमनेर या तालुक्‍यांतील खरिपाची पिके पावसाअभावी वाया गेली आहेत. मुळा, गोदावरी, कुकडी आणि भीमा नदीचा पट्टा सोडला तर बाकी ठिकाणी गंभीर दुष्काळी स्थिती आहे. वर्षानुवर्ष दुष्काळी असा शिक्का लागलेल्या तालुक्‍यांत तर यंदा गंभीर परिस्थिती असून आताच टॅंकरने पिण्यासाठी पाणीपुरवठा करण्याची वेळ आहे. काही ठिकाणी टॅंकर सुरू असून मागणीत वाढ होत आहे.

खरीप तर गेला, रब्बी मात्र दिलासा देणारा होता. मात्र पाऊस नसल्याने रब्बी पेरण्या सुरू होण्याला अडचणी निर्माण होत आहेत. आता परतीचा पाऊस सुरू झालाय, अगोदर पडला नाही तरी परतीच्या पावसाने अनेक वेळा मोठा दिलासा दिलेला आहे. साऱ्या पावसाळ्यात कोरडे असलेले नदी, नाले, तलाव यापूर्वी परतीच्या पावसात भरलेले आहेत.

यंदा मात्र तशी परिस्थिती दिसत नाही. पावसाचा मागमुस दिसेना. त्यामुळे रब्बीची पेरणी होईल की नाही याची कुठलीही शाश्‍वती नसतानाही शेतकऱ्यांनी मात्र आशावाद सोडलेला नाही. पावसाचे कसलेही संकेत नसताना परतीचा तरी नक्की पडेल या आशेने काही भागात ज्वारीच्या पेरण्या केल्या जात असल्याचे पहायला मिळाले आहे.

यंदा खरिपातून फारसे काही हाती लागले नाही. आता रब्बीची आशा आहे. पाऊस नाही, येईल की नाही याची खात्री नाही तरीही पेरणी केली आहे. मात्र आता ते पेरलेलेही अडचणीत आहे. मात्र आशा सोडलेली नाही. यंदा पाऊस झाला नाही तर पिण्याच्या पाण्यासाठी माणसांचे तसेच जनावरांचे हाल होतील, असे बोधेगाव येथील शेतकरी  लक्ष्मण तांबे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com