‘जलयुक्त’मुळे राज्य दुष्काळमुक्त होणार

मुंबई : राज्य स्तरावरील महात्मा जोतिबा फुले जलमित्र प्रथम पुरस्कार मळेगाव (ता. बार्शी, जि. सोलापूर) गावास जाहीर झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तो स्वीकारताना सरपंच गुणवंत मुंढे, सदस्य आणि ग्रामस्थ.
मुंबई : राज्य स्तरावरील महात्मा जोतिबा फुले जलमित्र प्रथम पुरस्कार मळेगाव (ता. बार्शी, जि. सोलापूर) गावास जाहीर झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तो स्वीकारताना सरपंच गुणवंत मुंढे, सदस्य आणि ग्रामस्थ.

मुंबई  : गेल्या तीन वर्षांत राज्यातील शेतकरी, शेतमजूर व सामान्य नागरिकांनी, तसेच सरकारी यंत्रणांनी टीम म्हणून केलेल्या कामामुळेच राज्यातील अकरा हजार गावे जलपरिपूर्ण झाली असून, या वर्षी आणखी पाच हजार गावे दुष्काळमुक्त होणार आहेत. जलयुक्तमुळे सर्वसामान्यांच्या जीवनात परिवर्तन झाले असून, या गतीने पुढील दोन वर्षे कामे केली, तर राज्य दुष्काळमुक्त होऊन शेतकरी सुखी होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

२०१५-१६ या वर्षात जलयुक्त शिवार योजनेत उत्कृष्ट कार्य केलेली गावे, तालुके, जिल्हे तसेच व्यक्ती, संस्था, अधिकारी व पत्रकारांना राज्यस्तरीय महात्मा जोतिबा फुले जलमित्र पुरस्काराचे वितरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी (ता. ४) यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झाले. या वेळी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, मृद व जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे, राज्यमंत्री विजय शिवतारे, राज्याचे मुख्य सचिव सुमीत मल्लिक, मृद व जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले, आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, महात्मा जोतिबा फुले यांनी शेतकऱ्यांच्या आसूड या त्यांच्या पुस्तकातून शेतकऱ्यांच्या उद्धारासाठी सांगितलेल्या उपायातूनच जलसंधारणाची ही महत्त्वाची योजना सुरू करण्यात आली.

राज्य स्तरावरील महात्मा जोतिबा फुले जलमित्र प्रथम पुरस्कार - मळेगाव (ता. बार्शी, जि. सोलापूर), द्वितीय क्रमांक - वेळू (ता. कोरेगाव, जि. सातारा), कर्जत (ता. कर्जत, जि. अहमदनगर) यांना; तर राज्य स्तरावरील तालुका संवर्गामध्ये पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यास प्रथम, सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यास द्वितीय, तर नाशिक जिल्ह्यातील चांदवड जिल्ह्यास तृतीय क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला.

सामुदायिक, अशासकीय संस्थांमध्ये प्रथम पुरस्कार - संस्कृती संवर्धन मंडळ (सगरोळी, ता. बिलोली, जि. नांदेड), द्वितीय पुरस्कार - आर्ट ऑफ लिव्हिंग सेवाभावी संस्था (जालना) यांना देण्यात आला. वैयक्तिक पुरस्कारामध्ये प्रथम पुरस्कार - संजय ज्ञानोबा शिंदे (नेकनूर, ता. जि. बीड), द्वितीय पुरस्कार - सुभाष उत्तमराव नानवटे (रा. दोडकी, ता. जि. वाशीम) यांना प्रदान करण्यात आला.

पत्रकारांसाठीचा प्रथम पुरस्कार - अविनाश अंकुशराव कदम (पुण्यनगरी, पुणे); द्वितीय पुरस्कार - संदीप दत्तू नवले (ॲग्रोवन, अहमदनगर),  तृतीय पुरस्कार - संगीता हनुमंतराव भापकर (दै. सकाळ) यांना, तर इलेक्ट्रॉनिक मीडियाचा प्रथम पुरस्कार रवींद्र शिवाजी कांबळे (सांगली), द्वितीय पुरस्कार - शशांक रमेश चवरे (अमरावती), तृतीय पुरस्कार - शशिकांत पाटील (लातूर) यांना देण्यात आला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com