अकोला ः उन्हाळ्यात हमखास उत्पन्न मिळवून देणारी भुईमूग, टरबूज, भाजीपाला ही पिके घेणाऱ्या शेतकऱ्यांना यावर्षी पाण्याची उपलब्धता नसल्याने मोठा फटका सहन करावा लागत आहे. तीनही जिल्ह्यांमध्ये पाणी समस्येमुळे उन्हाळी पिकांची लागवड घटली आहे. उन्हाळ्यात वऱ्हाडातील तीन जिल्ह्यांमध्ये सुमारे दहा हजार हेक्टरपर्यंत भुईमूग, भाजीपाला, टरबूज पिकांची लागवड होते. या हंगामात हे क्षेत्र पाच ते सहा हजार हेक्टरपर्यंत खाली आले असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
या वर्षात तिनही जिल्ह्यांमध्ये सरासरीपेक्षा पाऊस कमी झाला. जेवढा पाऊस पडला तो खंड स्वरूपात तसेच अनियमित होता. परिणामी नदी-नाले वाहिले नाहीत. प्रकल्पही कोरडेच राहिले. यामुळे भूजल पातळीतसुद्धा घट झाली आहे. प्रकल्पावर आधारित असलेल्या उन्हाळी पिकांच्या सिंचनावर परिणाम झाला आहे. तसेच विहिरींवर आधारित सिंचनातही घट झाली.
अकोला जिल्ह्यात उन्हाळ्यात प्रामुख्याने भुईमुगाची लागवड होते. तेल्हारा, अकोट, पातूर, बार्शिटाकळी या तालुक्यांमधील शेतकरी या पिकाला प्राधान्य देत असतात. मागील हंगामात भुईमुगाचे उत्पादन कमी झाल्याने शेतकऱ्यांनी यावर्षी फारशी लागवड केलेली नाही.
सध्या जी लागवड झाली त्या भुईमुगाच्या क्षेत्रावर प्रामुख्याने रिसोड तालुक्यात काही ठिकाणी मर रोगाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. यामुळे शेतकरी आता उपाययोजना करण्यात व्यस्त झाले आहेत. भाजीपाल्याच्या लागवडीलासुद्धा पाणीटंचाईचा फटका सहन करावा लागत आहे. टरबुजाचीसुद्धा तितकीशी लागवड झालेली नाही. या दुष्काळी परिस्थितीचा थेट फटका शेतकऱ्यांना सोसावा लागतो आहे.
हंगामात ज्वारी व इतर चारावर्गीय पिकांची लागवड कमी होती. उन्हाळ्यात काही शेतकरी चाऱ्याची पिके घेऊन तूट भरून काढण्याचा प्रयत्न करतात. यावर्षी पाणी कमी झाल्याने ही पिके घेण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. याची झळ पशुपालकांना बसू शकते. हिरवा चाऱ्याचे दर वाढण्याची शक्यता आहे.