कोल्हापूर : जिल्ह्यात सातत्याने धुके पडत असल्याने याचा परिणाम बहुतांशी करून नवीन लागवड झालेल्या उसाबरोबरच ज्वारीसारख्या रब्बी पिकावरही होणार आहे. धुक्याचे प्रमाण वाढल्यास कीड - रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.
शहरासह जिल्ह्यात सोमवारी (ता. ५) सकाळपासून धुक्याचे साम्राज्य राहिले. दुपारी बारापर्यंत सूर्यप्रकाश नव्हता. सकाळी पाच ते सात वाजेदरम्यान सलग धुके राहिल्याने याचा परिणाम पिकांवरही होण्याची शक्यता कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली.
सध्या जिल्ह्यात उस तोडणी व उसाची नवी लागवड वेगात सुरू आहे. धुके वाढल्यास उगवून आलेल्या उसाच्या पाल्यावर तपकिरी ठिपके पडण्याची शक्यता आहे. याचबरोबर ऊस तुटून गेलेल्या खोडव्याच्या उगवणीचेही नुकसान होण्याची शक्यता आहे. खोडक्यावर बुरशी तयार होऊन उसाच्या उगवणीत घट येऊ शकते. याचबरोबर रब्बी पिकांमध्ये जी ज्वारी पोटरीच्या अवस्थेत आहे त्या ज्वारीवर धुक्यातून निर्माण होणारे बारीक थेंब साचून कणसाच्या दर्जावरही परिणाम होण्याची भीती आहे.
जिल्ह्यात गहू व हरभरा ही रब्बीची मुख्य पिके आहेत. परंतु, या पिकांच्या पक्वतेचा कालावधी पूर्ण होत आहे. काही भागात हरभरा काढणीलाही आला असल्याने या पिकांना धुक्याची झळ फारशी पोचणार नसल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.